Karjat municipal governance controversy : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फलक काढले, कर्जत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे संकेत आहेत. सर्वपक्षीय रणकंदन झाल्यानंतर, कर्जत नगरपालिकेच्या कारभारावर राज्यभरातून टीका झाली. कर्जतमध्ये सर्वपक्षीय आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली.
या प्रकाराचा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी तातडीचा अहवाल तयार करून, जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालात, कर्जत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईबरोबर बडतर्फची कारवाईची शिफारस केल्याचे समोर येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य अजूनही शोकाकुल आहे. या दुःखातून पवार कुटुंबिय अजून सावरलेलं नाही. सर्वमान्यांना देखील अजित पवार यांच्या निधनांचा धक्का बसला आहे. या लोकनेत्याला राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. कर्जत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा विधानसभा मतदार संघ, कर्जत-जामखेडमध्ये वेगळाच प्रकार समोर आला.
कर्जत नगरपालिका प्रशासनाने अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फलक हटवण्याचा प्रकार केला. जेसीबी लावून हे फलक हटवले गेले. हे फलक हटवताना, त्यावरील अजितदादांच्या छायाचित्राची विटंबना झाली. या प्रकारानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह सर्व पक्षातील कार्यकर्ते चांगले आक्रमक झाले. प्रशासनाने केलेल्या प्रकाराचा निषेध करत, कर्जतमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आंदोलन केलं.
या आंदोलनात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नगराध्यक्ष आणि सभापती यांचा आदेश होता का, असा सवाल करत, राष्ट्रवादीने राम शिंदेवर टीका केली होती. तसंच मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.
दोन्ही राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रशासनाला निवेदन दिलं. प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी आंदोलनाला, समोरे जाताना वस्तूनिष्ठ अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर होईल, असे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता अहवाल सादर झाला आहे. यात कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंग आणि बडतर्फ करण्याची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जत नगरपालिका प्रशासनाने अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फलक हटवताना, निष्काळजी केल्याचे समोर आलं आहे. प्रशासनाकडे सीसीटीव्हीचे चित्रीकरण मागितल्यावर ते उपलब्ध झाले नाही. परंतु समाज माध्यमांवर चित्रीकरण पाहिल्यावर त्यात फलक आणि त्यावरील अजितदादांच्या फोटोची विटंबना झाल्याचे दिसते. बॅनर फाटल्याचे देखील दिसते. यामुळे आंदोलकांच्या दाव्यात सत्यता आढळते, असे अहवालात म्हटले आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी कर्मचाऱ्यांना बॅनर काढताना, काळजी घेण्याबाबत कोणतीच स्पष्टता दिली नसल्याचे दिसते. संवदेशनशील प्रकारात लोकभावना लक्षात घेऊन प्रशासकीय कामकाज करणे गरजेचे असते, ते इथं दिसले नाही. इथं मुख्याधिकाऱ्यांची कार्यवाही, कार्यपद्धती अत्यंत चुकीची आणि बेजबाबदारपणाची आहे. त्यामुळे मुख्याधिकारी कर्जत यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे, असे अहवालात म्हटले आहे.
यापूर्वी सुद्धा मृत्यंजय ग्रुपच्या पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी कर्जत यांच्या दालनात महापुरुषाच्या प्रतिमा का लावली नाही, अशी विचारणा केली असता मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वागले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीने सर्व पक्षीय लोकांनी नोव्हेंबर 2025 ला कर्जत शहर पूर्ण बंद ठेवण्यात आलं होतं. शासकीय अधिकाऱ्याच्या अशा कार्यपद्धतीमुळे कर्जत शहरात वारंवार कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होत आहे. ही बाब गंभीर असून, कर्जतचे मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याचेही अहवालात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.