Malegaon News, 25 Feb: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सध्या बांगलादेशी हा 'वन पॉईंट अजेंडा' सुरू आहे. मालेगाव दौरा त्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे. अन्य शहरांच्या तुलनेत मालेगावमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहर हे दहशतवाद्यांचा अड्डा आहे. बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान आहे. अशी विविध मुक्ताफळे उधळली. यामागे त्यांचा राजकीय अजेंडा स्पष्ट झाला आहे. यानिमित्ताने सोमय्या यांच्या दौऱ्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेष म्हणजे महापौरांसह विविध सामाजिक संस्था या निमित्ताने एकत्र आल्या आहेत.
या सगळ्यांनीच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृह विभागावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मालेगावात नवा राजकीय वाद जन्माला येण्याची चिन्हे आहेत. किरीट सोमय्या यांचा मंगळवारी झालेला मालेगाव दौरा विविध कारणांनी चर्चेत आहे.
यांच्या या दौऱ्याला कधी नव्हे एवढा तीव्र विरोध झाला. यामध्ये महापौर, उपमहापौर, नगरसेवकांसह विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले होते. विधायक कार्य समितीनेही या दौऱ्याला विरोध केला. सोमय्या यांना मालेगाव शहरात सहजपणे वावरणे शक्य झाले नाही.
सुरक्षा रक्षकांच्या प्रचंड गराड्यात त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र यातून मालेगावचे पोलीस आणि महापालिका प्रशासनही तणावाखाली आले आहे. अल्पसंख्यांक आणि अशिक्षित समाजाकडे जन्म दाखल्यांसाठी पुरेसे पुरावे नाहीत, हे वास्तव आहे.
आता त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू झाले आहे. सुमारे चार हजार जन्म दाखले रद्द करण्यात आले आहेत. हे जन्म दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
यातील काहींना निलंबित करण्यात आले आहे. काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. सोमय्या यांचा अजेंडा हा भारतीय जनता पक्षासाठी सामाजिक ध्रुवीकरण आहे, हे लपून राहिलेले नाही. माजी खासदार सोमय्या यांनी यापूर्वीही त्याबाबत जाहीर कबुली दिली आहे.
आता ते नव्याने सक्रिय होऊन राज्यातील छत्रपती संभाजीनगर, मालेगाव यांसह विविध शहरांचे दौरे करीत आहेत. त्यांचे हे दौरे भारतीय जनता पक्षाला लाभ मिळवून देतील का? हा उत्सुकतेचा विषय आहे. यानिमित्ताने मालेगाव विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी गृह विभागावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
मालेगाव शहरात बांगलादेशी नागरिक राहत असतील तर मुख्यमंत्र्यांचे पोलीस खाते अकार्यक्षम आहे असा अर्थ होतो. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांवरच या नेत्यांनी गंभीर टीका केली आहे. आता सोमय्या यांना मालेगावात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी सुरू झालेले हे राजकीय इशारे राजकारण कोणत्या दिशेला नेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.