Devendra Fadanvis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नातेवाईकांचा नव्हे, थोडा कार्यकर्त्यांचाही विचार करा!

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचा विजयाचा विश्वास.

Sampat Devgire

नाशिक : नेत्यांनो मला मिळाले तर उत्तम, इतरांना मिळाले तर वाईट. जे मिळेल ते नातेवाईकांनाच मिळाले पाहिजे, असा विचार पक्षाच्या हिताचा नाही. त्यामुळे नेत्यांनो नातेवाईकांचा विचार करणे सोडा व कार्यकर्त्यांचा विचार करा, असे प्रतिपादन भाजपचे (BJP) नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथी मनोहर गार्डन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नाशिकच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी उत्तम काम केले आहे. मी या शहरासाठी मेट्रोसह अनेक प्रकल्प दिले. त्यातून एक सुंदर व चांगले शहर आकाराला येत आहे. त्यामुळे जनता खुश आहे. महापालिकेवर भाजपचीच सत्ता येईल, यात कोणालाही शंका राहिलेली नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.

ते म्हणाले, मुख्यमंत्री पदावर काम करताना मला या महापालिकेसंदर्भात दोन सव्वा दोन वर्षांचाच कालावधी मिळाला. तरी देखील त्या सर्व कालावधीत जेव्हढ्या जास्तीत जास्त योजनाव विकासकामे करणे शक्य होते ते मी केले. ज्या योजना साकारणे शक्य होते त्या साकारण्याचा प्रयत्न केला. शहरात मेट्रो सुरु करण्याची आमची इच्छा होती. मात्र त्यापूर्वी दोन वेळा सर्व्हे होऊन नाशिकमध्ये मेट्रो सुरु करणे शक्य नाही असा अहवाल होता. तो फिजीबल नाही असा अहवाल होता. आम्ही जगभरामध्ये किती प्रकारच्या मेट्रो चालतात याचा माहिती घेतली. त्याबाबत सगळा अभ्यास केला. नाशिक शहराचा विस्तार व लोकसंख्येला कोणती मेट्रो सुरु करता येईल, याचा विचार करून मेट्रो प्रकल्प मंजूर केला.

ते पुढे म्हणाले, भाजप हा त्यागावर उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांनी देखील हा विचार करावा व नातेवाईकांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा विचार करावा. कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार करावा. अनेकांनी या पक्षाच्या त्यागातून हा पक्ष उभा राहिला आहे. त्यांनी आपले सबंध आयुष्य खर्ची घातले मा६ त्यांना साधे नगरसेवक देखील होता आले नाही. त्यामुळे मला मिळाले तर न्याय आणि इतरांना मिळाले तर अन्याय हा विचार सोडून दिला पाहिजे. मिळो कोणालाही, उमेदवाराचा चेहरा न पाहता आपला उमेदवार म्हणजे कमळाचे फूल. त्याला आपल्याला मतदान करायचे आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यांच्यात प्कचंड ताकद आहे. क्षमता आहे. या विचाराने पुढे गेलो तर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला कोणीही हरवू शकणार नाही.

श्री. फडणवीस यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली. ते म्हणाले, छत्रपती शिवजी महाराजांसाठी लढणारे मावळे संख्येने कमी होते. मात्र ते विरोधकांवर भारी पडत होते. कारण त्यांच्याकडे देव, देश धर्म व मागे उभे राहणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. तसेच आपल्या मागे उभे राहणारे नरेंद्र मोदी हे आहेत. त्यांच्याकरता देव, देश आणि धर्माकरीता म्हणजे सामान्य माणुस व त्याच्या कल्याणाकरीता या निवडणुकीत उतरायचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत आपण सगळ्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून काम करायचे आहे.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, धुळ्याचे महापौर प्रदिप कर्पे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार डॅा. राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापालिका स्थायी समिती सभापती गणेश गिते, सुरेश आण्णा पाटील, विजय साने, संभाजी मोरूस्कर, माजी महापौर रंजना भानसी, जिल्हा अध्यक्ष केदा आहे, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT