Mohri Gram Panchayat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pathardi Politics : सरकारी योजनांचा लाभ मिळेना; पाथर्डीतील मोहरी ग्रामपंचायत टाकणार निवडणुकीवर बहिष्कार ?

Pradeep Pendhare

Ahmednagar News: सरकारी योजनांचा लाभ आचारसंहितेपूर्वी न दिल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठराव पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मोहरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. मात्र काही ग्रामस्थांनी या ठरावाला विरोध दर्शवला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पाथर्डी पंचायत समिती (Pathardi Panchayat Samiti) कार्यालयाकडे मोहरी ग्रामपंचायत येथील विहिरी, गाय गोठा तर कृषी विभागाकडे फळबाग लागवड दाखल प्रस्तावांना मंजुरी न दिल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असा ठराव करून प्रशासनाला एक प्रकारे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. (Marathi News)

या निर्णयामुळे जिल्ह्यातील मोहरी हे गाव लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारे पहिले गाव आहे. मोहरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.1) ग्रामसभेत सर्वानुमते, असा निर्णय घेतला आहे की, सिंचन विहिरी, गुरांचा गोठा, फळबाग लागवड या वैयक्तिक लाभांच्या प्रस्तावांना आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी व कार्यारंभ आदेश न मिळाल्यास सर्व ग्रामस्थ येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून मतदानाचा हक्क न बजावण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसा ठराव केला असून याला सूचक महादेव बापूराव नरोटे तर अनुमोदक गविनाथ आश्रू नरोटे हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिकाऱ्यांनी 27 फेब्रुवारीला गावातील सर्व विहिरींची स्थळ पाहणी केली. त्यावर त्रुटींची तत्काळ पूर्तता करून पात्र प्रस्तावांचे पुढील पाच दिवसांत प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन देखील दिले. अशी ग्रामसभेत चर्चा झाली. परंतु त्यावर महादेव बापूराव नरोटे म्हणाले, स्थळ पाहणी केली म्हणजे मंजुरी दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत मंजुरीचा आदेश हातामध्ये पडत नाही, तोपर्यंत त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व प्रस्तावांना आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी न दिल्यास येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकावा असे सुचविले.

या विषयावर गावामध्ये मतमतांतर झाली. बहुसंख्य ग्रामस्थांनी टाळ्याच्या स्वरूपात एकमताने विषयास मंजुरी देण्याचे सुचविले. मात्र गावातील ग्रामस्थ विठ्ठल सोना ठोंबरे, दशरथ लिंबा नरोटे, पोपट साहेबराव नरोटे, भीमराव रामराव सुसलादे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या ठरावास विरोध दर्शवला. ते म्हणाले, सरकारमार्फत गावामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहे. आणि काही सुरू आहेत. त्यामुळे हा देखील सरकारकडून दिले जाणाऱ्या व्यक्तिगत लाभाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना, असा निर्णय न घेण्याची सर्वांना त्यांनी विनंती केली. परंतु ग्रामस्थ ठराव घेण्यावर ठाम होते.

सरपंच आशाबाई वाल्हेकर म्हणाले, व्यक्तिगत लाभाच्या सरकारी योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी घेणे हे प्राधान्यक्रम आहे. मात्र लोकसभा निवडणुकीवर मतदानाचा हक्क बजावण्यास बहिष्कार टाकणे हे योग्य नाही. परंतु सर्व विषय हा बहुमताने आल्याने प्रशासनास विनंती करण्यात येत आहे की, वैयक्तिक लाभाच्या इतर प्रस्तावना प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सर्व शेतकरी यांना सरकारी लाभाची मंजुरी द्यावी. आचारसंहिता लागण्यापूर्वी न झाल्यास ग्रामस्थांकडून सर्वानुमते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्या निर्णयास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही. असा ठराव सरपंच (Sarpanch) वाल्हेकर तथा ग्रामसभेच्या अध्यक्षा यांनी सर्वानुमते मंजूर केला.

दरम्यान, ग्रामसेवक श्रीकृष्ण खटावकर यांनी ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले. गविनाथ नरोटे, बाबा डोईफोडे, चंद्रकांत नरोटे, मैनुद्दीन शेख, संजय बन, पप्पु खटके, तुकाराम डोईफोडे, भागवत नरोटे यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT