Manoj Jarange- Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : आता ‘लढेंगे या मरेंगे, हम सब जरांगे’

Sampat Devgire

Maratha Reservation News : मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी आज पांगरी (सिन्नर) येथे झालेल्या सभेत सांगितले. (Manoj Jarange Patil`s Public meeting got huge Response in Sinner)

मराठा (Maratha) आरक्षण लढ्याचे प्रतीक बनलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पांगरी (Sinner) येथे सुरू असलेल्या उपोषणार्थींची भेट घेतली. येथे त्यांची सभा झाली. आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे नागरिकांमध्ये बसले होते.

दुपारी चारला होणाऱ्या या सभेला तीन तास विलंब झाला. मात्र, मोठ्या संख्येने नागरिक थांबून होते. या वेळी झालेल्या सभेत उपस्थितांनी मनोज जरांगे यांच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे विविध वक्त्यांनी जाहीर केले.

जरांगे पाटील म्हणाले, आमचे उपोषण वास्तव मागणीसाठी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याच्या नोंदी सर्वत्र आहेत. मराठवाड्यात उर्दू, फारसी, मोडी अशा विविध भाषेतील कागदपत्रांत या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेल्या आहेत. त्यामुळे उपोषणाबाबत चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसांचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो.

या वेळी सातत्याने टिकणारे आरक्षण हवे तर एक महिन्याचा कालावधी द्या, असे राज्य शासन वारंवार सांगत होते. खरे तर मंत्रिमंडळ एक ठराव करूनदेखील आरक्षण देऊ शकत होते. मात्र, त्यांनी दिलेले आरक्षण टिकले नाही, तर ते पुन्हा महिन्याचा कालावधी दिला नाही, असे म्हटले असते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याचा कालावधी देण्याचा ठराव करावा, यावर आम्ही एक होतो. तशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांनी केल्यावर आम्ही तीस नव्हे, तर चाळीस दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर हा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

जरांगे पाटील म्हणाले, यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला आत्महत्या करावी लागणार नाही. आंदोलन आमचे, मागणी आमची, अभ्यास आमचा, आरक्षणदेखील आमचे ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी किशोर चव्हाण, विलास पांगारकर, भाऊसाहेब शिंदे, संभाजी ब्रिगेडचे सुभाष कुंभार, कामगार नेते हरिभाऊ तांबे, दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, शरद शिंदे, प्रा. राजाराम मुंगसे, माजी सभापती राजेंद्र चव्हाणके, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, स्वराज्य पक्षाटे करण गायकर आदींनी या सभेचे संयोजन केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT