Manoj Jarange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Aarakshan Morcha : जरांगेंच्या मुक्कामी सभेच्या नियोजनाकडे पुढाऱ्यांनी फिरवली पाठ...

Pradeep Pendhare

Maratha Aarakshan Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे हे गेल्या सात महिन्यांपासून तीव्र लढा देत आहेत. आता त्यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. तशी पदयात्रा देखील निघाली आहे. या यात्रेला पुन्हा एकदा सकल मराठा समाजाकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नगरमार्गे ही पदयात्रा मुक्काम करून पुढे जात आहे. मराठा समाजाकडून याची जोरदार तयारी केली गेली आहे.

परंतु या नियोजनाकडे आजी - माजी आमदारासह राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने देखील याला दुजोरा दिला. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबई... मराठा लेकरांच्या भविष्यासाठी... अशी हाक दिली आहे. तशी पदायात्रा जरांगे यांनी सुरू केली आहे. या पदयात्रेचा नगरमध्ये मुक्काम होत आहे.

बाराबाभळी (ता. नगर) येथे आज रात्री ही पदयात्रा मुक्कामी आहे. या स्थळी जरांगे यांची सभा होणार आहे. हा मुक्काम यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाजाने जोरदार तयारी गेली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तयारी करत आहेत. बाराबाभळी येथील मुस्लिम समाजाच्या जामिया मोहमंदिया मदरसाने त्यांचे दीडशे एकर मैदान दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मैदानाच्या साफसफाईपासून ते मुक्कामी जेवणाची सोय आणि तेथून पुढे सोमवारी दि. 22 रोजी सकाळी नाश्ताच्या सोयीपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सकल मराठा समाज यासाठी पुढे आला आहे. भाजी - भाकरीचे टोपले बरोबर आणून पदयात्रेतील लोकांना जेवू - खाऊ घालणार आहे. तसेच पदयात्रेला पुढे जेवणाची सोय व्हावी, यासाठी चटणी - भाकरीचे टोपले देखील बांधून दिले आहे.

याशिवाय नगर तालुका आणि शहरातील मराठा समाजाकडून एकत्रित येत आजच्या मुक्कामी जेवणाची आणि उद्या सकाळच्या नाश्ताची सोय केली गेली आहे. यासाठी सकल मराठा समाजाचे गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते राबत आहे. मात्र या नियोजनाकडे आजी - माजी आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.

गेल्या दहा दिवसात या नियोजनात नगर जिल्ह्यातील एकही स्थानिक आमदार, माजी आमदार, नेते, पदाधिकारी सहभागी नसल्याचे सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीकडून सांगण्यात आले. आता जे काही होत आहे, ते मराठा समाजाकडून मदत होत आहे. बोटावर मोजण्या इतपतच मराठा समाजातील राजकीय लोकप्रतिनिधींनी मदत केली, असे देखील समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

पुढाऱ्यांच्या गावबंदीचा फटका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरूवातीला साखळी आणि त्यानंतर बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी पुढाऱ्यांना गावबंदीचा देखील निर्णय झाला होता. संपूर्ण राज्यात सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत होती. गावागावांमध्ये तसे सकल मराठा समाजाकडून फलक लावले गेले होते. याचा भाजपच्या नेत्यांना सर्वाधिक फटका बसला होता.

या निर्णयांवर टीका देखील झाली होती. आता जरांगे यांनी हे आंदोलन मुंबईच्या दिशेने वळवले आहे. लाखो आंदोलक या पदयात्रेत सहभागी झाले आहे. मुक्काम दरमजल करत मनोज जरांगे आणि पदयात्रेतील आंदोलक मुंबईकडे निघाले आहे. जेवणापासून इतर सर्व मुलभूत सोयींसाठी खर्च आहे.

याचे नियोजन करण्याचे आव्हान सकल मराठा समाजासमोर आहे. यात अनेक अडचणी येत आहेत. असे असले, तरी यातून मार्ग निघत आहे. मराठा समाज ताकदीने आंदोलनामागे उभा राहत आहे, असे समन्वय समितीने म्हटले आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT