Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या खासदारकीच्या वाटेत मराठा आंदोलक काटे पेरणार? नाशिकचं वातावरण तापलं

Sampat Devgire

Nashik Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार केव्हाही जाहीर होऊ शकतो. महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजित पवार गटाचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. या दोघांतील उमेदवारीवरून सुरू झालेल्या वादात महायुतीत उमेदवाराचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा बनला आहे. यात आता मोठा ट्विस्ट आला आहे. सकल मराठा समाजाच्या नावने भुजबळांना लोकसभेला मतदान करू नये, असे आवाहन करत त्यांच्या निषेधाची बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भुजबळांची राज्यात ओबीसी नेते म्हणून प्रतिमा आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी सर्वप्रथम पुढे येत मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) टीका केली होती. मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास जाहीर विरोध केला. राज्याच्या अनेक भागात जाऊन ओबीसी एल्गार मेळावेदेखील घेण्यात आले होते. त्या सगळ्यांचे नेतृत्व म्हणून भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते. त्याचे पडसाद यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर उमटणे अपेक्षितच होते. नाशिक मतदारसंघात त्यांच्या निषेधाने त्याचे पडतात उमटले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गावात नाशिक मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवारी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळाल्यास विरोध केला जाईल. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. त्याचा निषेध करीत त्यांना गावबंदी केल्याचा फलक महामार्गावर झळकला होता. आता हा फलक लागताच जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. हा फलक कोणी लावला हे मात्र समजू शकले नाही. त्यावर कोणाचेही नाव नाही, त्यामुळे पोलिसांनाही याबाबत कारवाई करणे अडचणीचे ठरत आहे.

दरम्यान, याबाबत भुजबळ समर्थकांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी तर राजकीय डाव म्हणून हा फलक लावला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पळसे गावांमध्ये असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याची मालकीसुद्धा खासदार गोडसे यांच्याकडे आहे. गोडसे यांचे विविध समर्थक या गावात आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या या गावातील कार्यकर्त्यांनी लावलेला हा फलक होता. नाशिक रोड पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत हा फलक काढून टाकला आहे. मात्र, फलक काढल्यावरदेखील राजकारण मात्र थांबलेले नाही.

या वादग्रस्त बॅनरबाजीमुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने बॅनर काढले आहेत. संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळकेंनी दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT