Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : ‘राहुरी'करांच्या मदतीला धावले आमदार नीलेश लंके

राजेंद्र त्रिमुखे

Nilesh Lanke News : निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी मिळावे यासह इतर प्रश्नांवरून राहुरी तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ते साेमवारपासून (ता. दाेन) उपोषण करत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत निळवंडे कृती समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत तातडीने बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले. (MLA Nilesh Lanke came to the aid of 'Rahuri's farmer)

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पुढे पायथ्याला निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दिग्गज नेत्यांनी सांगूनही पाणी सोडले जात नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे राहुरी तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले असून, यात आमदार लंके यांनी लक्ष घातले आहे.

निळवंडे कालव्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत निळवंडे कृती समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत तत्काळ बैठक लावली जाईल, असे आश्वासन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी दिल्यानंतर निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले.

निळवंडे धरणाच्या उजवा आणि डावा कालव्यांची कामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी राहुरी तालुक्यातील तांभेरे गावातील श्रीराम मंदिरात निळवंडी कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी महात्मा गांधी जयंतीपासून (ता. २ ऑक्टोबर) उपोषण सुरू केले आहे. परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.

निळवंडे धरणावर १८२ गावांचे पिण्याचे पाणी आरक्षित करावे, प्रस्तावित कालव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, डावा आणि उजवा कालवा हे बंदिस्तऐवजी उघड्या पद्धतीने करावेत, या मागण्यांसाठी दादासाहेब पवार यांनी गेल्या ४ दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. अनेकांनी या उपोषणास पाठिंबा दिला होता.

दरम्यान, गुरुवारी रात्री अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन हे उपोषण सोडण्यात आले आहे. या वेळी आमदार लंके म्हणाले की, निळवंडे कालव्याप्रश्नी अनेक वर्षांपासून शेतकरी संघर्ष करीत आहेत. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा, ही प्रामाणिक भावना आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार व फडणवीस यांच्या उपस्थितीत कृती समितीची मुंबईत बैठक लावणार असल्याचेही लंकेंनी सांगितले. निळवंडेबाबत केवळ फ्लेक्सबाजी झाल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांसाठीचा हा लढा जिंकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा शब्दही आमदार लंके यांनी दिला.

प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट

निळवंडे कालव्याप्रश्नी तांभेरे येथील उपोषणकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून निळवंडे कालव्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करून लाभार्थी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारू, असा इशाराही आमदार तनपुरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT