Satyajeet Tambe : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Chavan Resignation : 'खूप काही बोलायचंय,पण...'; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आमदार सत्यजीत तांबेंची खदखद ?

Ganesh Thombare

Mumbai News: काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर काँग्रेसचे अजून काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी एक्सवर (ट्विटर) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. (Ashok Chavan Resignation)

काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती पाहून मनाला वेदना होत असून आपण खूप अस्वस्थ झालो आहोत, याबाबत खूप काही बोलायचं असल्याचं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सत्यजीत तांबे खूप अस्वस्थ झाल्याचं त्यांच्या पोस्टवरून दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्यजीत तांबेंनी एक्सवर काय म्हटलं ?

"महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे 22 वर्ष तन, मन, धनाने दिले त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही!", असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षात काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळीही काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. यामध्ये सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सत्यजीत तांबेंनी अप्रत्यक्ष टीका केली होती. तेव्हापासून तांबे कुटुंब काँग्रेसपासून वेगळं झालं.

आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे काँग्रेसला लागलेली घरघर कधी थांबणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यातच चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबेंनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत असून आपण 22 वर्ष ज्या संघटनेत काम केलं, त्या संघटनेची ही हालत पाहून अस्वस्थ झालो आहोत,खूप काही बोलायचंय, पण बोलणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे सत्यजीत तांबेंना नेमकं काय बोलायचं आहे, याबाबत आता सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT