Bhausaheb Wakchaure On Sadashiv Lokhande sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhausaheb Wakchaure On Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंच्या विधानावर भडका; खासदार वाकचौरे आणि रुपवतेंचं जखमेवर मीठ

Pradeep Pendhare

Sadashiv Lokhande Statement News : शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पराभवाच्या कारणापैकी एक अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्ला मंदिर असल्याचे सांगून वाद ओढवून घेतला. यावर विरोधकांनी लोखंडे यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाला घेरण्यास सुरवात केली आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी लोखंडेंची मोजक्याच पण चांगल्या शब्दात खरडपट्टी काढली.

'अकोलेसारख्या आदिवासी भागात रावणाबाबत कधीच दुजाभाव केला जात नाही. लोखंडे यांनी हा शोध कुठून लावला माहिती नाही', असे सांगून खासदार वाकचौरे यांनी लोखंडे यांच्याभोवती आणखीच वाद वाढवून दिला. दरम्यान, माजी खासदार लोखंडे यांनी आपल्या विधानावर मागे झाले असून विधानाची चुकीची मांडणी केल्याचे सांगितले आहे.

शिवेसना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कर्जतमध्ये माध्यमांशी संवाद साधला. शिर्डीकडून येत सदाशिव लोखंडे यांनी कर्जतमध्ये माध्यमांशी संवाद साधण्यामागे राजकीय गणिते असल्याचे सांगितले जात आहे. हा संवाद साधताना सदाशिव लोखंडे यांनी पराभवाची कारणे सांगितले. लोकशाहीत सर्व काही चालते. हे मान्य करावे लागते. माझ्या पराभवाला अनेक कारणं आहेत.

परंतु त्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठा आदिवासी भाग आहे. या समाजाला अयोध्येमधील प्रभू श्रीराम लल्लाचे मंदिर रुचले नाही. यातून मला मतदान झाले नाही, असे सदाशिव लोखंडे यांनी संवादात म्हटले होते. सदाशिव लोखंडे यांच्या विधानावर आता वाद सुरू झाला आहे. भाजपने देखील या विधानाची दखल घेतली आहे. परंतु विरोधकांनी लोखंडे यांच्या विधानावर टीका करण्यास सुरवात केली आहे.

शिर्डीचे (Shirdi) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील त्यावर टिप्पणी करत लोखंडे यांच्याभोवती वाद आणखी वाढवून दिला आहे. 'अकोले तालुक्यात मी जन्माला आलो आहे. या भागात रावणाबाबत कधीच दुजाभाव केला जात नाही. लोखंडे यांनी हा शोध कुठून लावला माहिती नाही. मतदारसंघातील जनता त्यांना काय सांगायचे ते सांगेल', असे म्हटले आहे.

खासदार वाकचौरेंपूर्वी 'वंचित'च्या उत्कर्षा रूपवते यांनी देखील सदाशिव लोखंडे यांच्या विधानवर टिप्पणी केली. 'अनेक वर्ष आमदार-खासदार राहिलेल्या लोकप्रतिनिधींचे, असे विचार ऐकल्यावर राग येण्याऐवजी कीव येते. अवघड आहे सगळंचं!', अशी प्रतिक्रिया उत्कर्षा रुपवते यांनी दिली.

खासदार वाकचौरे म्हणाले, "मराठा आणि ओबीसी हा वाद मिटला पाहिजे. यातून समाजाचेच नुकसान होत आहे. शिवसेना खरी कोणती हे जनतेला माहिजी आहे. नेमकी कुठली खरी शिवसेना हे जनतेने ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीतही ते दाखवून दिले आहे". विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या बाजून कौल असणार आहे, असेही खासदार वाकचौरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT