Dada Bhuse News: आदिवासी आणि दुर्गम भागातील शैक्षणिक दुरावस्था नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. यावर नेत्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच उपदेश करीत आले आहेत. मात्र या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा एक धाडसी प्रयोग चक्क नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेने करून दाखवला.
सोमवारी शासकीय शाळांचा पहिला दिवस होता. त्याचा गाजावाजा करत शासकीय स्तरावर मोठे कार्यक्रम झाले. या सगळ्यांमध्ये सुगंध राज्या पुढे एक आदर्श निर्माण करणारा धडा चक्क नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी प्रशासनापुढे ठेवला आहे.
दुर्गम आणि राज्याच्या कोपऱ्यात असलेल्या धडगाव येथील तोरणमाळच्या शाळेत काल जाणत्या नागरिकांना रोमांच उठावेत असा प्रसंग घडला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस या शाळेत चक्क जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी या आपल्या जुळ्या मुलांसह दाखल झाल्या. त्यांनी या मुलांना या आदिवासी शाळेत दाखल केले. केल्या वर्षीही त्यांनी हाच प्रयोग केला होता.
आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळांचा दर्जा कसा सुधारेल ही चिंता प्रशासनातील आणि शिक्षण विभागातील प्रत्येक जण व्यक्त करीत असतो. मात्र त्यासाठी कृतिशील धडा जिल्हाधिकारी डॉ सेठी यांनी गिरवला आहे. आपल्या मुलांना त्यांनी या शाळेत दाखल केले. त्यामुळे प्रशासन आणि शिक्षकांवरही दर्जा टिकविण्याचा नैतिक दबाव निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ सेठी यांच्या या प्रयोगाने शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील भारावले. या शाळेतील पहिल्या दिवसाचा उपक्रम साजरा करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांसह आमदार आमश्या पाडवी, शिक्षण उपसंचालक भावना राजनूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांसह अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येकाने डॉ सेठी यांचे अनुकरण केल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नवी पहाट उगवण्यास फार कालावधी लागणार नाही, ती प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.
यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी येत्या सहा महिन्यात आदिवासी शिक्षणात कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा विचार आहे. या संदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. आदिवासी आणि दुर्गम भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्येकाने त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
परिसरातील 20 शाळा एकत्र करून तोरणमाळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी शैक्षणिक संस्था उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच टॉप मॅच अर्थात सर्वोच्च दर्जाचे संकुल निर्माण करण्यात येत आहे. ठिकाणी विज्ञान-तंत्रज्ञान याबरोबरच क्रीडा प्रभव देणे आणि पारंपारिक शिक्षणाला विज्ञानाची जोड देण्याचा निर्धार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ सेठी यांनी सांगितले.
स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्या मुलांना सरकारी किंबहुना आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळेत दाखल करणे ही अनेकांना थक्क करणारी गोष्ट ठरली आहे. असा प्रयोग किमान जिल्हा परिषद आणि आश्रम शाळेतील शिक्षकांना सक्तीचा केल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढीला नक्कीच चालना मिळेल. प्रत्येक शिक्षकही त्यात जीव ओतून काम करील, असा कृतिशील धडा एका जिल्हाधिकाऱ्यानेच घालून दिला आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.