Nana Patole with Akash Chhajed
Nana Patole with Akash Chhajed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress; निस्तेज नेत्यांत आत्मघातकी गटबाजी पुन्हा सुरु!

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : (Nashik) काँग्रेसला (Congress) चांगल्या वैद्याची किंवा डॉक्टरची (Doctor) गरज आहे. गरज भासल्यास मनोविकारतज्ज्ञही उपयोगी पडू शकतील. काँग्रेस नेमकं काय करतेय, हे त्यांनाही समजेनासे झाले आहे. शांत, थंड, ढिम्म आणि दिशाहिन (Directionless) असे सगळेच शब्द काँग्रेसला तंतोतंत लागू पडतात. ज्या पक्षात एक से एक धुरंधर होते, तो पक्ष आज नेतृत्वहीन (leaderless) आणि निस्तेज (Glassy) झाला आहे. (Congress leaders don`t know even there glassy & Dull political situation)

सत्ता नसली म्हणजे तेज संपते, हे जरी खरं असलं तरी कोणत्याही प्रकारची ऊर्मी या पक्षात उरलेली नाही. कदाचित रायपूरमधून थोडाफार उत्साह मिळेल, अशी आशा राजकीय क्षेत्रातील निरीक्षक व्यक्त करत आहेत.

कोण्या एकेकाळच्या अत्यंत बलाढ्य मानल्या गेलेल्या काँग्रेसची दुरवस्था आता पाहिली जात नाही. अनेक शहरांतील काँग्रेस भवन सध्या ओस पडलेले दिसून येतात. या काँग्रेस भवनातील वीजबिल कोणी भरावं, यावरुन वादंग झडतात.

काँग्रेस एकच असली तरी बहुतांश मोठ्या शहरांमध्ये काँग्रेसच्या सध्याच्या कार्यकारिणीशिवाय समांतर काँग्रेस सुरू असल्याचे दिसते. शिवाजी महाराजांची जयंती दोन नेते वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतात.

‘आगीतून फुफाट्यात’ ही म्हण काँग्रेसला आता लागू पडत नाही. काँग्रेस काही वर्षांपासून कोमात गेली होती, आता ती व्हेंटिलेटरवर गेल्याचं दारुण चित्र दिसत आहे.

काँग्रेसला अजूनही एक खात्री वाटतेय. जी अजिबात रास्त नाही. भाजपच्या सरकारला लोक कंटाळतील आणि लोक काँग्रेसकडे आर्जव करतील, की तुम्ही या आणि आता सत्ता सांभाळा. या भ्रमातून काँग्रेस आठ वर्षांपासून सावरलेली नाही.

लोकांच्या मनात भाजपबद्दल खदखद आहे आणि एक ना एक दिवस ती बाहेर येईल, अशा सोज्वळ आशेवर तमाम काँग्रेसची मंडळी आहेत. मुळात भाजपबद्दल रोष आहे की नाही, हे पडताळून पाहण्याची कोणतीही यंत्रणा काँग्रेसकडे नाही.

भाजपबद्दल नाराजीचं वातावरण पसरत असल्याचे काँग्रेसच्या कैकपट आधी भाजपलाच समजते. त्यानंतर ती नाराजी कशी दूर करता येईल, याची विस्तृत योजना भाजपकडे तयार होते, त्यावर काम करून भाजपनं पुढच्या विषयात हात घातलेला असतो.

काँग्रेसला जनतेतून एखाद्या विषयाची नाराजी समजेपर्यंत पुलाखालून अनेक क्युसेक्स पाणी निघून गेलेलं असतं. काँग्रेसची दखल आता कोणीही घेईनासं झालंय, ही बाब आत्तापर्यंत काँग्रेसजनांना कळायला हवी होती. अजूनही गटतटाचं राजकारण सोडविण्यासाठी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींकडे धाव घ्यावी लागते.

लोकांमध्ये थेट जाण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग काँग्रेसकडे उपलब्ध नाही. लोकांचे शिव्याशाप नेमके काय आहेत, हे जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी काँग्रेसकडे उपलब्ध नाही. राज्यस्तरीय नेते शहरांमध्ये आले, की उपस्थित कार्यकर्त्यांपेक्षा स्टेजवरच नेत्यांची गर्दी अधिक असते.

लोक कितीही वैतागले तरी ते राजकीय पक्षांच्या किंवा नेत्यांच्या दारात जात नाहीत. लोकांना सक्षम पर्याय हवा असतो. सामान्य जनांच्या म्हणून ज्या काही समस्या आहेत, त्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधावा लागेल. आश्वासक चेहरा लोकांना जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत जनता राजकीय पक्षांना कोणताही थारा देत नसते.

सध्याच्या घडीला काँग्रेसकडे एकही आश्वासक चेहरा नाही. तिसरी-चौथी, तर सोडाच दुसरी फळीही नाही. पहिल्या फळीतील नेत्यांना पक्षाबद्दल काहीही देणं घेणं नाही. कुठल्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची काँग्रेसची तयारी शून्य आहे.

वरपासून ते अगदी तळातील पदाधिकाऱ्यांपर्यंत पदांसाठीची रस्सीखेच दिसून येते. वास्तविक ही रस्सीखेच अनाकलनीय आहे. अनेक वर्षे जे पदाधिकारी पदांवर आहेत, ते असताना कोणताही फरक पक्षाच्या प्रतिमेत पडलेला नाही, तरीही पद भूषवण्याची तळमळ काही केल्या जात नाही.

एक ना एक दिवस आपल्या पक्षाची सत्ता येईल, तेव्हा आपलं हे पद कामी येईल, अशी समजूत बहुधा या पदाधिकाऱ्यांची असावी. अगदी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता, कुठेही काँग्रेसबाबत आश्वासक स्थिती नाही. या उलट असलेले किल्ले ढासळवण्याची रणनीती आखताना काही काँग्रेस नेते दिसून येतात.

सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे. भाजप हे अचूक जाणून आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा उत्सव साजरा केला जातो. लोकांमध्ये जाऊन त्यांना अर्थसंकल्प समजावून सांगितला जातो. एखादा मुद्दा चुकला, तरी त्यावर असंतोष माजण्यापूर्वीच पुढच्या मुद्द्याला हात घातला जातो. या वेगवान परिस्थितीमुळे काँग्रेसच्या डोक्याला मुंग्या आल्याची स्थिती आहे. लोकांपुढे स्थानिक पातळीपासून राज्य स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढच्या काळात हिंग लावूनही काँग्रेसला कुणी विचारेल, अशी परिस्थिती नसेल. सध्या तरी काँग्रेसला सावरण्यासाठी शुभेच्छा देण्यावाचून अन्य काही पर्याय दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT