Nashik News : जायकवाडी धरणात सोडलेल्या पाण्यावरुन नाशिक-मराठवाड्यातील पाणीवाद पुन्हा पेटला आहे. मृत साठ्याच्या नावाखाली नाशिकच्या हक्काचे पाणी मराठवाड्याकडे पळवले जाते, असा आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. फरांदे यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे नेमके किती पाणी सोडण्यात आले? जून महिन्यात जायकवाडीतील पाणीसाठा किती होता? धरणाकडे सोडण्यात येणाऱ्या विसर्गावर नियंत्रण नेमके कोणाचे आहे अशा प्रश्नांचा भडीमार करत आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीला महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आदी उपस्थित होते.
नाशिककरांच्या हक्काच्या पाण्याबाबत अधिकारी माहिती लपवित असतील तर आमदार आपली जबाबदारी चोख पार पाडतील, असा इशाराच आमदार फरांदे यांनी दिला. जायकवाडीतील किती मृत साठा वापरण्यात आला, त्याचा अचूक हिशेब मांडण्यात अधिकारी अपयशी ठरले. नियमांचे उल्लंघन करून नाशिकचे पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकच्या हक्काच्या पाण्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसल्याचा इशारा फरांदे यांनी दिला. मराठवाड्यात बारमाही शेती आणि नाशिकच्या शेतकऱ्यांनी तिमाही शेती करून द्राक्षबागा उद्ध्वस्त कराव्यात ही भूमिका स्वीकारार्ह नसल्याचं त्या म्हणाल्या.
गोदावरीचे उगमस्थान, पाणी नियोजन आणि नियंत्रण नाशिकमधून होत असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये का ठेवले, असा प्रश्न करीत ते तातडीने नाशिकला हलविण्याची मागणी त्यांनी केली.
अधिकारी माहिती लपवत असल्याचा आरोप
सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्याने विसर्ग सुरु होता. नांदूरमध्यमेश्वर येथून ९४ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. या पाण्यापैकी जायकवाडी धरणात प्रत्यक्षात किती पाणी पोहोचले, याची अधिकृत आकडेवारी आमदारांनी मागितली. परंतु, प्रशासनाकडे अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने फरांदे संतापल्या. नाशिकमधून सोडल्या जाणाऱ्या या पाण्याचा हिशेबच उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. अधिकारी आकडेवारीची लपवालपवी करीत असल्याचा आरोप फरांदे यांनी केला.
गंगापूरसह दारणा आणि पालखेड धरण समुहातील धरणांमधून सोडलेले पाणी नांदूर मध्यमेश्वरमार्गे मराठवाड्यातील जायकवाडीकडे जाते. सध्या नांदूर मध्यमेश्वरमधून ९४ हजार ४९७ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. समनिहाय पाणी वाटपाच्या मुद्यावरून नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाडा यांच्यात कायमच संघर्ष होत आला आहे. पावसात धरणे भरत असताना मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीकडे सोडल्याकडे लक्ष वेधत हा प्रकार नाशिकच्या हिताविरोधात असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
नाशिकच्या धरणांमधून अवघ्या ४८ तासांत सुमारे ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहून गेले, त्यापैकी 5 टीएमसी पाणी प्रत्यक्ष जायकवाडीत पोहोचणार आहे. हा विसर्ग करताना नाशिकच्या भविष्यांतील गरजांचा विचार करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठवाड्याच्या राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे काही अधिकारी नाशिकच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.