Nashik Kumbh Mela security and weapon permits: नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरु आहे. दरम्यान आता, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही साधू-महंतांनी शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. मात्र, आता यातून नव्या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
प्राप्त झालेल्या अर्जापैकी दोन जणांना जिल्हाप्रशासनाकडून शस्त्र परवान्याची मंजुरी देण्यात आली आहे. तर, दोन अर्ज चौकशीसाठी पाठविण्यात आले असून दोन अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या साधू-महंतांनी आखाड्यांची संपत्ती व सुरक्षेचे कारण देत शस्त्र परवान्याची मागणी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत कोट्यवधी भाविक दाखल होतील. या भाविकांची सुरक्षा व सोयी सुविधेसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाकडून शहरात जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आता साधू-महतांकडून करण्यात आलेली शस्रपरवान्याची मागणी चर्चेत आली आहे.
दोघांचे अर्ज मंजूर
त्र्यंबकेश्वर येथील लवलेश प्रसाद पांडे आणि आवाहन आखाड्याचे अभिनव मिश्र यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.
दोघांचे अर्ज चौकशीसाठी पाठवले
तर मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड येथील स्वामी जयदेवपुरी महाराज आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री सिद्धेश्वरानंद सोमेश्वरानंद यांचे अर्ज पुढील चौकशीसाठी पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
दोघांचे अर्ज नामंजूर
तरसाळी येथील महंत स्वामी ओमनंदपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील रामनाथ आर्य यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
साधूंना शस्त्रांची गरज काय? महंत शंकरानंद सरस्वतींचा सवाल
दरम्यान, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे त्र्यंबकेश्वर येथील कोशाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी साधूंना शस्त्र हवे तरी कशाला? असा सवाल उपस्थितीत केला आहे. साधू-महंतांकडून शस्त्रांची मागणी झाल्यास सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
आखाड्यांच्या नावाखाली कुणालाही शस्त्र परवाना देण्याची आवश्यकता नाही. योग्य कारणास्तव परवान्याची गरज असल्यास संबंधित आखाड्याचे अधिकृत पत्र प्रशासनाने मागवावे. आखाडा परिषदेची मान्यता मिळाल्यावरच अशा मागणीचा विचार व्हावा.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात आखाड्यांमध्ये चोवीस तास पोलिस बंदोबस्त असतो. त्यामुळे शस्त्र परवान्याची आवश्यकता नसल्याचे मत महंत शंकरानंद सरस्वती यांनी मांडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.