Shivaji Kon Hota controversy : बुलढाण्यातील एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण राज्यात गाजत आहे.
विशेष म्हणजे, आणदार गायकवाड यांनी धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांवर एकनाथ शिंदे शिवसेनेवर टीका होत आहे. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी, या प्रकरणात उडी घेत, 'लोकप्रतिनिधी कसा नसावा', याची चर्चा स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी करून दिल्याचा सूचक टोला लगावला.
आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्यावर पोस्ट शेअर करत, काॅ. गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ला, त्यांचे झालेले निधन, यातून प्रबोधन म्हणून, 'शिवाजी कोण होता?' पुस्तकांच्या वाटलेल्या 10 हजार प्रती, त्याचे वाटप करतानाचे जुने फोटो देखील आमदार तांबेंनी शेअर केले आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड यांच्यावर सूचक टोलेबाजी केली आहे. आमदार तांबे यांनी म्हटलं आहे की, "चुकीच्या पद्धतीने का होईना, संजय गायकवाड यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला, हात घालून राज्यात पुन्हा एकदा “शिवाजी कोण होता?” या विषयावर चर्चा सुरू करून दिली. त्याच बरोबर “लोकप्रतिनीधी कसा नसावा” यावरही चर्चा सुरू करुन दिली."
'खरं तर, या विषयाची चर्चा नव्या पिढीत होणं अत्यंत गरजेचं होतं. कॉ. गोविंद पानसरे यांचं “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक 1987 साली प्रकाशित झालं. म्हणजे आज जवळपास 39 वर्षांनंतरही पुस्तक न वाचता हा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं,' अशीही टिप्पणी आमदार तांबे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभ्यासक्रमातील मुद्यावर भाष्य करताना, आमदार तांबे यांनी त्यांच्या मुलीबरोबर झालेल्या किस्सा सांगितला. गेल्या आठवड्यात आमदार तांबे मुलगी अहिल्यासोबत गप्पा मारत होते. त्यावेळी तिने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात?” असा प्रश्न केला. या प्रश्नावर बोलताना, आमदार तांबे यांनी, एक गोष्ट स्पष्ट झाली की, आजच्या नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, असे गंभीर निरीक्षण नोंदवलं.
16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि 20 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचं निधन झालं. नेमकं त्याच काळात 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती, पानसरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहरात “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सुमारे 10,000 प्रती वाटून प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता, ती आठवण देखील आमदार तांबे यांनी सांगितली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करताना बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेत एक समावेशक स्वराज्य उभारलं. स्वराज्य म्हणजे एक प्रकारे लोकशाहीवादी विचारच होता, ज्यात राजाने जनतेला लुटून ऐश-आराम करण्यापेक्षा रयतेला केंद्रबिंदू ठेवून राज्य कारभार करणे होय. आज महाराष्ट्र ज्या उंचीवर उभा आहे, त्यामागे हाच विचार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. म्हणूनच, ही चर्चा केवळ वादासाठी नव्हे, तर योग्य समज, अभ्यास आणि पुढील पिढीला दिशा देण्यासाठी व्हावी, अशी अपेक्षा सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना, संजय गायकवाड यांचे फोनवरचे संभाषण ऐकून हसावे की रडावे, असे झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'परस्त्रीला आई मानावे' हा दंडक घालून दिला होता. शिवाजी महाराज स्वराज्य आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही नेहमी आदर करत असत. त्यामुळे गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांमुळे महाराज कधीच माफ करणार नाहीत, हेही तितकेच खरे, असेही सत्यजीत तांबे यांनी म्हंटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.