Chhagan Bhujbal News, Narayan Rane News, Manikrao Kokate & Vasant Gite,  Eknath Shinde News
Chhagan Bhujbal News, Narayan Rane News, Manikrao Kokate & Vasant Gite, Eknath Shinde News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिंदे असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेने (Shivsena) अनेक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्यातील क्षमता ओळखून मोठे केले. पदे दिली. यातील अनेक पद मिळताच फुटले. शिवसेनेच्या आजवरच्या चारही बंडात नाशिकच्या (Nashik) शिवसेनेचा थेट संबंध राहिला आहे. ज्यांनी ज्यांनी बंड केले ते मोठे झाल्याचेही पहायला मिळाले. यंदाच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सामील आमदार सुहास कांदे यांचे तसे होईल की कारकिर्द संपेल याची उत्सुकता आहे. (Whenever insurrection in shivsena Nashik leaders involvement there)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकशी घनिष्ट संबंध राहिले आहेत. ते नियमीत नाशिकला येऊन अनेकांशी सल्लामसत करीत असत. नाशिकशी संबंध असलेले छगन भुजबळ हे दोनदा मुंबईचे महापौर होते. ते पक्षाचे पहिले आमदार देखील होते. १९९० मध्ये केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार असताना मंडल आयोग स्विकारण्यात आला. शिवसेनेने त्याला विरोध केला. ओबीसींच्या प्रश्नावरून श्री. भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यावरून बराच गोंधळ झाला होता. पुढे छगन भुजबळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. उपमुख्यमंत्री व सलग मंत्री राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. (Nashik Latest Marathi News)

माणिकराव कोकाटे चौथ्यांदा आमदार

राज्यात १९९९ मध्ये शिवसेना, भाजपचे सरकार गेले आणि काँग्रेसचे सरकार आले. तेव्हा शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या तेरा आमदारांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये राणे यांना राज्याच्या मंत्री मंडळात स्थान मिळाले. त्यांच्याबरोबर गेलेल्या तेरा आमदारांपैकी बहुतांश पराभूत झाले. या बंडात सिन्नरचे माणिकराव कोकाटे होते. ते पुढे काँग्रेसच्या चिन्हावर पुन्हा आमदार झाले. चार वेळा त्यांनी सिन्नर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा चारही पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढलेले ते एकमेव असावे. मात्र त्यांना राज्यस्तरावर कोणतेही पद मिळाले नाही.

वसंत गिते आमदार झाले

राज ठाकरे यांचा विद्यार्थी सेनेचे प्रमुख असल्यापासून नाशिक शहराच्या राजकारणात हस्तक्षेप होता. महापालिकेत शिवसेनेचे सत्ता होती. तेव्हा प्रत्येक महापौरांना त्यांची मर्जी साभांळावी लागत होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. मनसेच्या स्थापनेच्या हालचालींचे केंद्र नाशिक होते. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातांना त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यात शिवसेनेने नाशिकचे महापौर केलेल्या वसंत गिते यांचा सहभाग होते. त्यांच्या परिश्रमाने मनसेची ३९ नगरसेवक निवडून आले. पुढे गिते यांसह शहरात मनसेचे तीन आमदार निवडून आले. श्री. गिते मनसेचे विधीमंडळाचे उपनेते देखील झाले.

सुहास कांदे यांचे काय होणार?

तीन दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला मोठा हादरा दिला. त्यांच्या या बंडात पहिल्यांदाच नांदगाव मतदारसंघातून निवडून आलेले सुहास कांदे सक्रीय होते. या बंडाची प्रक्रीया सुरु आहे. त्यातून पुढे काय होते, हे लवकरच कळेल. सध्या श्री. कांदे यांचे समर्थक नव्या मंत्रीमंडळात श्री. कांदे मंत्री होतील असा दावा करीत आहेत. तो किती वास्तवाला धरून आहे, काय घडेल हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र यानिमित्ताने शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झाले, त्यात नाशिकचा संबंध होता.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT