Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News; आम्ही फुटीरांशी लढायचे, तुम्ही त्यांना पुष्पगुच्छ द्यायचे?

सरकारनामा ब्युरो

जळगाव : (Jalgaon) आम्ही पक्षासाठी लढायचे. पक्षातील (NCP) फुटीरांशी दोन हात करायचे, आणि तुम्ही विरोधकांना जाऊन मिळालेल्या फुटीरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा. जिल्हा बँकेत (District Bank) पक्षाविरोधात जाऊन अध्यक्ष झालेल्या फुटीर संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यावर कारवाई का झाली नाही?. हे किती दिवस चालायचे?. या संतप्त प्रश्नाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सामोरे जावे लागले. यावेळी बैठकीतील वातावरण चांगलेच तापल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. (NCP State President faced the party`s angry worker question on District Bank rebel)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.

यावेळी धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक व दूध संघाच्या संचालकांनी बंडखोरी करीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा प्रश्‍न उपस्थित केला. जिल्हा बँकेत संजय पवार यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली. गटाच्या संचालकांत फूट पाडून विरोधकांच्या मदतीने पद मिळविले. त्यांनी असे केले तरी त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही.

बंडखोरांनी जिल्हा बँकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध उमेदवारी केली. भाजप, शिवसेना- शिंदे गटाच्या मंत्र्यांची साथ घेऊन ते चेअरमन झाले. हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून पक्षाला सरळ सरळ दिलेले आव्हान होते. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन जिल्हा बँकेचे चेअरमनपद मिळविले. त्यानंतर मुंबई येथे पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी पन्नास ते साठ कार्यकर्ते उभे राहून संताप व्यक्त करीत होते. पंकज महाजन, बापू राजपूत, धनराज माळी, मंगला पाटील यांच्यासह धरणगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी थेट नेत्यांना प्रश्न विचारले. पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, उलट त्यांचा सन्मान करण्यात आला. वरिष्ठ स्तरावरील नेते असे करीत असतील, तर तळागाळात आम्ही पक्षाचे काम कसे करायचे? पक्षातर्फे त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्‍न त्यांनी केला.

योग्य ती कारवाई होईल : पाटील

बैठकीत अचानक हा गलका झाल्याने नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्यांची समजूत काढत खाली बसवले. त्यानंतर कार्यकर्त्यांना शांत करीत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या प्रकाराची दखल घेतली आहे. त्यांच्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य ती कारवाई करतील. तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देता पक्ष बळकट करण्यावर भर द्यावा.

उमेदवारच घोषित करा

पक्षातर्फे फुटीरावर कारवाई केली जात नाही. नेते व कार्यकर्ते पक्षाचे काम करतात. मात्र, निवडणुका आल्या, की ऐनवेळी त्यांची उमेदवारीही कापली जाते. आता विधानसभा निवडणुकीची तयारी कार्यकर्ते करीत आहेत. आपणही जळगाव ग्रामीण मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. इतरांनीही काम सुरू केले आहे. मात्र, ऐनवेळी उमेदवार बदलले जातील, अशी भिती आहे. त्यामुळे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार आताच घोषित करा, असा आग्रह गुलाबराव देवकर यांनी धरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT