Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure : आमदार तनपुरे दोन तास तहसील कार्यालयात; नेमकं कारण काय?

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : मुळा डाव्या कालव्यातून सुर असलेल्या आवर्तनावर वेगळाच निर्णय झाल्याने आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले. राहुरी तहसीलदारांच्या दालनात गुरुवारी (ता. 16) त्यांनी तब्बल दोन तास बसून राहिले. त्यावेळी त्यांनी पिकांसाठी, पशुधन वाचवण्यासाठी आर्वतन वाढवण्याची मागणी लावून धरली. यावर सायंकाळपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास उद्या शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. नगर-मनमाड रस्त्यावर होणारे हे आंदोलन प्रशासनाला परवडणार नाही, असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला आहे.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जात आहे. यात अर्धा टीएमसी पाण्याची वाढ केल्यास पिकांना दिलासा मिळेल. अधिकाऱ्यांनी देखील यावर सकारात्मकता दाखवला होती. परंतु हा निर्णय काल सायंकाळी अचानक फिरवला गेला. या फिरवलेल्या निर्णयावर आमदार प्राजक्त तनपुरे Prajakt Tanpure यांनी नाराजी व्यक्त केली आणि राहुरी तहसील कार्यालय गाठले.

आवर्तनाच्या मागणीवर आमदार तनपुरे ठाम राहिले. तहसीलदार नामदेवराव पाटील, अभियंता विलास पाटील, अभियंता अच्युत गीते यांनी सरकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शवली. यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आज सायंकाळपर्यंत आवर्तन वाढवण्याचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून आमदार तनपुरे आणि लाभधारक शेतकऱ्यांना Farmers देण्यात आले. यानंतर लाभधारकांनी तहसीलदार यांचे दालन सोडले.

आमदार तनपुरे म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाची मागणी केल्यावर ते वाढवून पिकांसाठी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला सांगण्यात आले होते. तसे नियोजन देखील झाले होते. पंरतु कोठे माशी शिंकली हे कळाले नाही आणि अधिकाऱ्यांनी निर्णय मागे घेतला. यानंतर लाभधारक शेतकरी संतप्त झाला आहे. हीच संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलो.

पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. 25 टक्के पिके हाताशी आहेत. आवर्तन न मिळाल्यास ती जगतील. पशुधन आणि चारा उपलब्धतेसाठी हे आवर्तन उपयोगी ठरेल. तसेच खालवलेली भूजल पाणी पातळीत वाढ होईल. त्यामुळे वाढीव आवर्तन गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

आवर्तनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी देखील संपर्क झाला आहे. आम्ही कमी पाणी मागत आहोत. ते आवर्तनाच्या माध्यमातून सोडणे शक्य आहे. यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही. यानिमित्ताने पिकांना जीवदान मिळेल. याबाबत सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्या डाव्या कालव्यावरील लाभधारक शेतकरी नगर-मनमाड रस्ता आडवू. या आंदोलनात शेतकरी, गुरं-ढोरं,महिला-मुलं देखील सहभागी होतील, असा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी त्यांच्याबरोबर मुळा डाव्या कालव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांसह अरुण तनपुरे, रवींद्र मोरे, दिलीप इंगळे, आदिनाथ तनपुरे, नवनाथ थोरात, पंढरीनाथ पवार आदींनी राहुरी तहसील कार्यालयात गर्दी केली. आवर्तनाची मागणी करत आमदार तनपुरेंसह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात बसून घेतले. हा ठिय्या तब्बल दोन होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT