Sharad Pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs NCP : 'खंडणी'वरून राजकारण पेटले, पुरावा दाखवत शरद पवार गटाचे भाजपला प्रत्युत्तर

Roshan More

BJP Vs NCP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली नसल्याच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी इतिहासाचा दाखल देत शिवाजी महाराजांनी सूरतला नोटीस पाठवली आणि खंडणी मागितली. त्यांनी सुरत लुटली. लुटले म्हणजे लुटारू नाही, असे वक्तव्य केले.

जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले त्यांनी जयंत पाटलांनी शिवप्रेमींची जयंत पाटलांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्याला शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटरवरील पोस्टमधून कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' पुस्तकाचा पुरावा देत म्हटले आहे की, ‘खंडणी’ या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ‘खंडणी’ शब्दावरून आरोप करण्याऐवजी अगोदर शिवछत्रपतींचा इतिहास समजून घ्यायला हवा. आणि हो, ज्यांच्या मनातच ‘शिवद्रोह’ आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठून कळणार म्हणा…, असा टोला लगावला आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, 'महाविकास आघाडीला खंडणी मागायची आणि वसुली करायची सवय लागली आहे. म्हणूनच जयंत पाटलांनी शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली अशी मुक्तफळ उधळली. त्यांना लाज कशी वाटत नाही. शिवाजी महाराजांविषयी अशी मुक्तफळं उधळायला. माझी आग्रहाची मागणी आहे त्यांनी शिवप्रेमींची माफी मागावी.'

शरद पवार गट काय म्हणाला?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, होय… ‘खंडणीच’ शब्द. इतिहास काय सांगतो… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती ही 1906 मध्ये प्रसिद्ध झाली. या चरित्राच्या भाग एकविसाव्यातील पान क्रमांक 355 वर ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आढळून येतो.

1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुस-यांदा सुरत लुटून पुन्हा स्वराज्याकडे मोर्चा वळवला, त्यावेळी त्या शहरातील रहिवाशांना उद्देशून महाराजांनी एक पत्र लिहिले, सदर पत्रात "तुम्ही प्रतिवर्षी बारा लाख रुपये ‘खंडणी’ बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहरास पुनः लुटीची भीती उरणार नाही!" असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT