Sharad Pawar, Radhakrishn Vikhe, Manoj Jarange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Vs Pawar : आंदोलनावरून विखे-पाटलांची जरांगेंना साद; तर पवारांना खडा सवाल; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मोबीन खान

Ahmednagar Political News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटलांनी आज मुंबईकडे कूच केली आहे. या आंदोलनात कोट्यवधी लोक सहभागी होण्याचा दावा जरांगेंनी केला आहे. याचा परिणाम मुंबईवर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरक्षणासाठी सर्व ती प्रक्रिया सुरू असूनही जरांगे आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे सरकारमधील काही मंत्र्यांनी जरांगेंशी चर्चा न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे. हे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी केले, तर आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनाही त्यांनी खडा सवाल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनास प्रतिसाद देत विखे-पाटलांनी कोपरगावातील शनिमंदिरात स्वच्छता केली. यावेळी विखे म्हणाले, 'सरकारने मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात कुणबी दाखल्यांबाबत विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचे वाटप झाले पाहिजे, ही भूमिका आमची आहे.'

'दरम्यान, 54 लाख नोंद सापडलेली आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे. सरकारने पाऊल पुढे टाकलेले आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांनी सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपले आंदोलन स्थगित केले पाहिजे,' अशी साद विखेंनी घातली.

तर 'शरद पवार (Sharad Pawar) केंद्रात मंत्री राहिले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले, हे त्यांनी एकदा सांगावे,' असा प्रश्नाही विखेंनी पवारांना केला आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टच्या वतीने देशातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएसचा असल्याचा आरोप करत विरोधातील अनेक नेत्यांनी सोहळ्यास जाणे टाळले आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी हिंदूत्ववादी म्हणवून घेणाऱ्या ठाकरेंवर सडकून टीका केली.

विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, काँग्रेससह विरोधी पक्षांनी अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण नाकारून कोट्यवधी रामभक्तांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी. शिवसेनेचे उद्धव ठाकरेंनी सांगितले अयोध्येला जाणार नाही. त्यांनी हिंदूत्व केव्हाच सोडलेले आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळली जात होती, त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणे म्हणजे त्यांचे खरे रूप काय आहे हे समोर आले आहे, अशा शब्दांत विखेंनी ठाकरेंचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तलाठी भरती प्रकिया रद्द होणार नाही

राज्यात झालेल्या तलाठी भरतीप्रक्रियेवरून मोठा गोंधळ उडाला आहे. तलाठी भरतीप्रक्रियेत कॉपीचा प्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही भरतीच रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर विखेंनी, तलाठी भरतीप्रकिया रद्द होणार नाही. कारण त्यात पूर्ण पारदर्शकता पाळली गेली आहे. कोणावर अन्याय झालेला नाही. कुणीतरी बातम्या पेरत आहे. राजकीय पुढाऱ्यांनी हजारो मुलांच्या भावनेशी खेळू नये. आज निकाल वेबसाइटवर गेलेले आहेत, ज्यांची गुणवत्ता यादीत नावे आली त्यांना संधी मिळणार आहे, असेही विखेंनी स्पष्ट केले.

जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही

श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यावर विचारले असता विखे-पाटील म्हणाले, सध्या राज्यापुढे कोणत्याही नवीन जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव नाही. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबवत आहे. राज्यात अनेक प्रश्न आहे. ते प्राधान्याने सोडवण्यासाठी सरकारचे प्राधान्य राहणार आहे. सध्या तरी जिल्हा सरकारच्या दृष्टीने प्राधान्यक्रम नाही, असे विखे यांनी म्हटले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT