Rahuri election update : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यापेक्षा उमेदवारी अर्ज न भरणारे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
प्राजक्त तनपुरे यांच्याशिवाय राहुरीतून भाजपचा मताधिक्य मिळणार नाही याची पुरेपुर हेरून असलेले भाजप नेते, पु्न्हा त्यांना संपर्क करण्याच्या तयारीत आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच तनपुरे यांची भेट घेणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले आहेत.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईने पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला नाही. यानंतर तनपुरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारात ते दिसणार का? असे प्रश्न भाजपचेच कार्यकर्ते, पदाधिकारी चर्चेत आणत आहे.
प्राजक्त तनपुरे भाजप (BJP) उमेदवाराचा प्रचारात दिसणार का? यावर सुजय विखे यांनी, हा प्रश्न प्रदेशाध्यक्षांना विचारला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष 16 तारखेला येणार आहेत. त्यांची येण्याची वाट पाहू. आम्ही निश्चित त्यांना विनंती करायला जाणार आहोत. आपण थांबला जरी असाल, आपल्या मदतीची गरज आहे. भाजपच्या उमेदवारासाठी आपण आपली ताकद लावावी, ही विनंती करणं आमचं काम आहे. प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघंही, त्यांच्याकडे जातील, असे स्पष्ट केलं.
दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, आपण महाविकास आघाडी सोडलेली नाही. भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. अजून तीन वर्षे जायची आहे. 2029ला पुन्हा रणसंग्राम करणार आहोत. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका मांडलेली आहे. प्राजक्त तनपुरेंच्या या भूमिकेवर भाजप नेते त्यांची पुन्हा भेट घेत आहेत. त्यामुळे या भेटीची पुन्हा राजकीय उत्सुकता वाढली आहे.
प्राजक्त तनपुरे अन् भाजप नेत्यांच्या भेटीचे संकेत खुद्द सुजय विखे पाटील यांनी देताच, त्याचे राजकीय विश्लेषक वेगळ्या अँगलने पाहू लागले आहे. तनपुरेंचं भाष्य, महाविकास आघाडी न सोडल्याचं, निवडणूक न लढण्याची भूमिका, मुख्यमंत्र्यांचं फोनवरील आश्वासन, प्रदेशाध्यक्ष अन् पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द, यामुळे ते भाजपमध्ये नसले अन् आमदार जरी राहिले नसले, तरी ते राहुरीचे प्रश्न सक्षमपणे मार्गी लावू शकतात. एकप्रकारने तनपुरेंनी भाजपमध्ये आपला स्वतःचा भाव वधारून घेतला आहे.
उमेदवारी न करण्याचा निर्णय घेऊन, तनपुरेंनी राजकीय दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतलेला दिसतो. परंतु पुन्हा भाजप नेत्यांच्या भेट घेऊन, भाजप उमेदवाराचा प्रचारात सक्रिय होणे, तनपुरे स्वतःचे राजकीय नुकसान करण्यासारखे आहे, असे विश्लेषकांनी निरीक्षण नोंदवलं आहे.
उमेदवारी न केल्याने तनपुरे यांना त्यांच्या मतदारसंघात राजकीय संघटनाला फटका बसणार आहे. हे तनपुरे जाणून आहेत. त्यामुळे ते आगामी काळात अधिक सावध भूमिका घेताना ते दिसतील. तो बसू नये म्हणून त्यांना भाजपला न दुखवता अनेक राजकीय गणित साध्य करावी लागणार आहेत. उमेदवारी अर्ज न भरण्यापर्यंत ठीक होतं. भविष्यात तनपुरेंना प्रतिस्पर्धी म्हणून भाजपकडून उमेदवार म्हणून अक्षय कर्डिलेच असणार आहेत. त्यांच्याच प्रचारात आता सक्रिय होण्याची चूक, तनपुरे करतील का? या प्रश्नाचं उत्तर भाजप नेत्यांच्या भेटीनंतर कळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.