Uddhav Thackeray Raj Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray Nashik : राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडलं 'लकी' नाशिक, ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता..

Raj Thackeray's MNS convention begins in Nashik today : नाशिकच्या इगतपुरी येथे आजपासून (दि. १४) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. पुढचे तीन दिवस हे शिबीर चालणार आहे.

Ganesh Sonawane

Raj Thackeray : हिंदी सक्तीविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता राज ठाकरे यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी खास त्याचं लकी शहर अर्थात नाशिकची निवड केली आहे.

नाशिकच्या इगतपुरी येथे आजपासून (दि. १४) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. पुढचे तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. या शिबीरात उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात राज ठाकरे भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिबीराकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना नाशिक शहरात राज ठाकरे यांचा विशेष रस होता. मनसेच्या राजकीय वाटचालीत नाशिक शहराची भूमिका कायमच महत्वाची राहिली आहे. ऐकेकाळी हेच नाशिक मनसेचा बालेकिल्ला होता. २००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरेंनी नाशिक मध्ये एण्ट्री केली. तेव्हा माजी महापौर वसंत गिते, अतुल चांडक यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची साथ दिली.

२००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत मनसेचे १२ नगरसेवक निवडून आले होते. ऑक्टोबर २००९ मध्ये शहरातील तिन्ही मतदारसंघांत मनसेचे आमदार निवडून आले. वसंत गिते, नितीन भोसले आणि दिवंगत नेते उत्तमराव ढिकले हे आमदार झाले. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंटवर विश्वास ठेवत तब्बल ४० नगरसेवक निवडून दिले होते. त्यांनी भाजपच्या मदतीने महापालिकेत सत्ता मिळवली. मनसेचे अशोक मुर्तडक हे नाशिकचे महापौर झाले.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सामन्यात मनसेला रिंगणात उतरवलं. त्या वेळी मनसेकडून हेमंत गोडसे यांनी उमेदवारी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विजयी झाले. मात्र मनसेने शिवसेनेला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेची पडझड व्हायला सुरुवात झाली. मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर मनसेला नाशिकमध्ये घरघर लागली. नाशिकच्या मनसेचा चेहरा असलेले वसंत गिते यांना राज ठाकरे यांनी साइड ट्रॅक केल्याने पक्षात अस्वस्थता वाढली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही दिवसांतच वसंत गिते यांनी मनसे पक्ष सोडला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षात मोठी फूट पडली.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठ्या गळतीचा सामना करावा लागला. पक्षातील अनेक माजी नगरसेवकांनी भाजप व शिवसेनेचा मार्ग स्वीकारला, त्यामुळे संघटनात्मक बळ कमी झालं. याच निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या थेट ४० वरून केवळ पाचवर आली, हा पक्षासाठी मोठा राजकीय झटका ठरला.

पुढील काळात अनेक प्रमुख चेहरे पक्षातून निघून गेले आणि २०२५ पर्यंत केवळ स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख हेच जुने नेतृत्व शिल्लक राहिलं. मात्र, सध्या प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत असून, माजी नगरसेवकांना पुन्हा संघटनेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT