Operation Tiger : उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. हे खासदार फोडण्यासाठी विरोधकांकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे. काल यांसदर्भात मोठ्या घडामोडी घडल्या परंतु या ऑपरेशनला अद्याप यश आलेलं नाही.
या ऑपरेशन टायगर'चा सुगावा उद्धव ठाकरे यांना नेमका कसा लागला व हे ऑपरेशन हाणून पाडण्यासाठी मातोश्रीवर घडामोडी कशा सुरु झाल्या त्याची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना या ऑपरेशनचा सुगावा लागल्याचे समोर आले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांची निष्ठा प्रामुख्याने यामागे कारण ठरल्याचे दिसत आहे. राजाभाऊ वाजे यांच्या एकनिष्ठतेची सध्या देशभरात चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजाभाऊ वाजे यांना ऑफर येताच याबाबत त्यांनी आपले वडील प्रकाश वाजे यांच्याशी चर्चा केली. प्रकाश वाजे यांनी तत्काळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आणि माजी आमदार भाऊसाहेब शिरोळे यांचे पुत्र श्रीकांत शिरोळे यांच्या माध्यमातून त्यांनी 'ऑपरेशन टायगर'ची माहिती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मातोश्रीवर सूत्रे हलली. फोनाफोनी सुरु झाली. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत फोनवर वाजेंशी संवाद साधला.
या घडामोडींविषयी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेने राजाभाऊंना यापूर्वी आमदारकी दिली आणि आताही खासदारकीही दिली. आम्ही यावर समाधानी असून आम्हाला कुठेही जाण्याची अजिबात इच्छा नसल्याचं प्रकाश वाजे म्हणाले.
प्रकाश वाजेंनी सांगितलं की, त्या रात्री उशिरा दीड- दोन वाजता मी स्वतः मिलिंद नार्वेकरांना फोन करून ' ठाण्यातून दोन लोक आले होते' अशी माहिती दिली. त्यानंतर उद्धव साहेबांचा मला फोन आला. मी साहेबांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. आम्ही कुठेही जाणार नाही आणि शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहणार आहे. एकनाथ शिंदे तुमचा योग्य तो मान राखतील. भरपूर विकास निधी मिळेल अशी ऑफर होती. २०२९ ची देखील ऑफर दिली होती असं प्रकाश वाजेंनी सांगितलं.
दरम्यान कालच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज संसदीय पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थितीत राहण्यासाठी सर्व ९ खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या बैठकीला केवळ राजाभाऊ वाजे, अनिल देसाई व अरविंद सावंत हे तीन खासदार उपस्थितीत राहिले. उर्वरित सहा खासदार या बैठकीला अनुपस्थितीत राहिल्याने ऑपरेशन टायगरची शक्यता गडद झाली आहे. या सहा खासदारांनी व्हीपचे पालन न केल्याने ठाकरे गटात अस्वस्थता आणखी वाढली आहे. आता ठाकरे गटाकडून या खासदारांवर काय कारवाई होते ते पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.