Rajabhau Waje, Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje : सिन्नर तालुक्याला ठाकरेंनी काय दिलं... दिघोळे साहेब, माणिकराव कोकाटेचं नाव घेत राजाभाऊंनी काय सांगितलं?

Rajabhau Waje On Sinnar Politics Uddhav Thackeray : आपण ठाकरेंसोबत एकनिष्ठ का राहिलो यासंदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सिन्नर तालुक्यात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Ganesh Sonawane

Nashik Politics : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे ठाकरेंकडे आता केवळ तीनच खासदार उरले आहेत. पैकी अनिल सावंत व अनिल देसाई दोघेही मुंबईचे आहेत. मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्रात केवळ एकच खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले आहेत. ते म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे.

फुटीच्या या वादळातही खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने ते देशभर चर्चेत आले आहेत. त्यांच्या एकनिष्ठतेचे देशभरात कौतुक होत आहे. ते आता लोकप्रिय झाले आहेत. अशात राजाभाऊ वाजे हे आपल्या मतदारसंघात नाशिक व सिन्नर तालुक्यात परतल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. अलिकडेच राजाभाऊ वाजे यांचा सिन्नर येथे विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात बोलताना राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका मांडली. "मी पक्षाशी प्रामाणिक राहिलो, कारण शिवसेनेने आणि उद्धव ठाकरे यांनी मला सामान्य कार्यकर्त्यापासून खासदार होण्याची संधी दिली. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचे ऋण मी कधीही विसरणार नाही. माझा राजकारणाचा प्रवास पदासाठी नव्हे, तर विचारांसाठी आहे. मी कालही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना वाजे म्हणाले की, अनेक प्रकारची प्रलोभने आणि चर्चा झाल्या; मात्र मतदारांचा विश्वास आणि पक्षाशी असलेली बांधिलकी यापेक्षा मोठे काहीही नाही. "ज्या पक्षाने मला आमदारकी, खासदारकी आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली, ज्या पक्षाने सिन्नर तालुक्याला स्वर्गीय दिघोळे साहेबांच्या रूपाने मंत्रीपद दिले, माणिकराव कोकाटेंना प्रथम उमेदवारी याच पक्षाने दिली. इतिहासात प्रथम जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद दिलं त्या पक्षाशी बेईमानी करणे म्हणजे मतदारांशी प्रतारणा ठरेल. त्यामुळे पक्षांतराचा प्रश्नच उद्भवत नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सिन्नरमध्ये झालेल्या या नागरी सत्कार सोहळ्याला कॉंग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार अॅड. विलास लोणारी, कवी नितीन चंदनशिवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांनी हा सोहळा केवळ एका खासदाराचा नसून लोकशाही, संविधान आणि मतदारांच्या विश्वासाचा गौरव असल्याचे सांगितले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सत्तेचा दबाव, प्रलोभने आणि राजकीय अस्थिरता यांच्यामध्येही आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सन्मान होणे, ही लोकशाहीसाठी आशादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT