Rajendra Phalke Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajendra Phalke News: महायुतीतील सर्व घटकपक्ष विखेंना मान्य आहेत का? फाळकेंनी डागली तोफ

Pradeep Pendhare

Nagar News : नगर जिल्ह्यातील महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने टीकेची तोफ डागली आहे. 'महायुतीमध्ये अससेल्या घटक पक्षातील तीन-तीन आमदार, एक माजी आमदार गैरहजर होते. त्यामुळे महायुती सगळ्यांना घेऊन जात आहे का? नेहमीच स्वतंत्र व्यासपीठ पाहिजे असलेल्या विखेंना सर्व घटकपक्ष मान्य आहेत का? हा मेळावा म्हणजे विखेंच्या चिरंजीवांसाठी नगर दक्षिण लोकसभेची तयारी आहे', अशी तोफ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (शरद पवार गट) यांनी डागली आहे. महायुतीचा हा मेळावा म्हणजे, मनाने एकत्र नसलेले पक्ष. त्यात विखे असल्यावर हे एकत्र येऊच शकत नाही. विखे यांची मोडस ऑपरेंडी सर्वांना माहित आहे की, ते स्वपक्षाला कधीच मोठे होऊ देत नाही, असेही फाळके यावेळी म्हणाले.

महायुती मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी समाज माध्यमांवर विक्रम-वेताळाच्या रूपात मॉर्फिंग केलेल्या ठाकरे-पवार यांच्या छायाचित्राचा संदर्भ देत टीका केली होती. या टीकेवर राजेंद्र फाळके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फाळके म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हापासून ठाकरे-पवार एकत्र आहे. सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव असे आहे की, हे दोघे एकत्र आल्यापासून एकही निवडणूक महाराष्ट्रात झालेली नाही. ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्यांचे रिझल्ट सर्वांना माहित आहेत. या दोघांना बदनाम करण्याशिवाय सत्ताधाऱ्यांकडे अजेंडाच नाही. आता लोकसभा निवडणुका होत आहेत, यात कोण किती पाण्यात आहे, हे कळेल.

कोणी साखर वाटली, कोणी राम मंदिराचा अभ्यास केला. हे सर्व निघेल. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. पुरोगामी विचार मानणारे खूप लोक आहेत. लोकसभेलाच त्यांना कळेच की, ४८ जागांपैकी किती जागा मिळतात ते!" भाजपने पूर्ण ताकद लावून शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली. ही फोडण्याची गरज का पडली? ते जर विक्रम-वेताळ आहेत, तर हे पक्ष फोडण्याची गरज का पडली? हा प्रश्न आहेच. सामान्य लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. सत्ताधारी हे फक्त ईव्हेंटच्या माध्यमातून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून निवडणुकीत यश येणार नाही. मराठा आरक्षणातून निवडणूक कोठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. मुंबईला मोर्चा धडकल्यानंतर निवडणूक कोठे जाईल, हे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारतील, असेही फाळके यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधी पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेतून सावरले आहे. उद्धव ठाकरे सावरले असून, ते सध्या आक्रमकपद्धतीने काम करताना दिसत आहे. महाराष्ट्रासह त्यांना देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी आता कुठे सावरली आहे. सत्ताधाऱ्यांच्या अनेक गोष्टी आहेत. भाजपच्या गृहमंत्र्यांच्या मुलाने आठ शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. शेतकरी आंदोलनात सातशे शेतकरी शहीद झाले. सात हजार कोटी फटका अर्थव्यवस्थेला बसला. यांच्या काळात 90 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात आठ कोटी शेतकऱ्यांचा सन्मान निधी बंद केला. घरगुती महागाई १५ टक्के वाढली, या मुद्यांकडे विरोधकांनी अधिक लक्ष घातल्यास सत्ताधारी भाजपला अवघड जाईल, असेही राजेंद्र फाळके ( Rajendra Phalke ) यांनी म्हटले

महाराष्ट्रातील प्रत्येक जागांचे गणित महत्त्वाचे!

लोकसभा आणि इतर निवडणुका एकत्र घेणे फायद्याचे आहे का तोट्याचे आहे, याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना आहे. भाजप सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा हिंदुत्वाच्या मुद्यावर जिंकायची आहे. खालच्या कितीही निवडणुका कोणीही जिंकू, ते राज्य कसे खिळखिळे करायची ही यंत्रणा त्यांच्याच ताब्यात ठेवायची आहे. महाराष्ट्रातील 48 जागा खूप काही गणित जुळवू शकतात किंवा बिघडवू शकतात. या जागा महायुतीला मिळाल्या नाही, किंवा या जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, तर बराच फरक पडणार आहे. महाराष्ट्रात ३०च्या पुढे जो जाईल, तो परिवर्तन घडवू शकतो. यासाठीच महाराष्ट्रात महायुतीचा खटाटोप सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणे गरजेचे होते. या निवडणुका घेतल्यास त्याचा परिमाण लोकसभेवर होईल, त्यामुळे भाजप सत्ताधाऱ्यांनी त्या घेतल्या नाहीत, हे उघड सत्य आहे, असे राजेंद्र फाळके यांनी म्हटले.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT