Satyajeet Tambe On Rajesh Exports Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe On Rajesh Exports : '15.15 लाख कोटींचा फुगवटा'; राजेश एक्स्पोर्ट्स प्रकरणावर सत्यजीत तांबेंचा सवाल, "सरकारे बदलतात... व्यवस्था बदलते का?"

Satyajeet Tambe questions accountability system after SEBI findings alleged revenue inflation Rajesh Exports : सेबीने राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेडच्या केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याने मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराने देशभरात खळबळ उडाली आहे. यावर आमदार तांबे यांनी त्यांच्या एक्स खात्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Pradeep Pendhare

Rajesh Exports SEBI Investigation : जागतिक स्तरावर सोन्याच्या व्यापारातील महाकाय कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेडच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

कंपनीने तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल दाखवला असला, तरी त्यातील मोठा भाग फुगवलेला किंवा संशयास्पद असल्याचे सेबीच्या प्राथमिक चौकशीत समोर आल्याने या प्रकरणाची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमधून मोठ्या आर्थिक घोटाळ्यांकडे पाहण्याच्या यंत्रणेच्या दृष्टिकोनावर टीका करत सरकार आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला.

प्रत्येक निवडणुकीत आता सर्व काही बदलेल, असे सांगितले जाते. सरकारे (Government) बदलतात, पक्ष बदलतात, नेते बदलतात. पण एखादी कंपनी कथितपणे 15.15 लाख कोटी रुपयांचा चुकीचा किंवा फुगवलेला महसूल दाखवू शकते आणि त्याबाबत प्रश्न उपस्थित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तेव्हा खरोखरच व्यवस्थेत काही बदल होतो का? असा थेट सवाल आमदार तांबे यांनी उपस्थित केला.

तांबे यांनी स्पष्ट केले की, हा मुद्दा केवळ राजेश एक्स्पोर्ट्स किंवा एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. उलट, ही घटना संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी आहे. सामान्य नागरिकांच्या अगदी किरकोळ चुका तपासल्या जातात, मात्र मोठ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणे अनेकदा संथ गतीने पुढे सरकतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

उत्तरदायित्व कमकुवत

यावेळी त्यांनी उत्तरदायित्वाच्या प्रश्नालाही हात घातला. संबंधित संस्था नुकसान झाल्यानंतरच कारवाई करत असतील, तर ती केवळ भ्रष्टाचाराची समस्या नसून उत्तरदायित्वाच्या कमकुवत व्यवस्थेचे लक्षण असल्याचे आमदार तांबे यांनी म्हटले आहे.

व्यवस्थेतील सुधारणा गरजेची

सरकारे येतील आणि जातील; मात्र जोपर्यंत व्यवस्थेत मूलभूत बदल होत नाहीत, तोपर्यंत वेगवेगळ्या नावांनी अशाच कथा पुन्हा-पुन्हा समोर येत राहतील, अशी गंभीर टिप्पणी करत आमदार तांबे यांनी व्यवस्थेतील सुधारणांची गरज अधोरेखित केली.

यंत्रणांच्या कारभाराविषयी चर्चा

राजेश एक्स्पोर्ट्स प्रकरणामुळे केवळ एका कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नाही, तर देशातील नियामक यंत्रणा, तपास प्रक्रिया आणि आर्थिक उत्तरदायित्व यांच्याविषयीही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT