Rajnath Singh News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajnath Singh News : विरोधी पक्षांची 'इंडिया आघाडी' म्हणजे एक 'कुणबा' ; राजनाथ सिंह यांचा निशाणा

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : अनेक विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत असताना जगात आज आर्थिक प्रगतीवर पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. लवकरच देशची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल. जग आज आपल्याला पूर्वीसारखे दुर्लक्षित न करता आपल्याकडे लक्ष देऊन पाहत आहे. अशा परिस्थितीत आपले विरोधी पक्ष मुंबईत आज (ता.३१) पुन्हा एकदा एकत्र येत आहे. विरोधी पक्षांनी हा 'इंडिया' नावाचा कुनबा (परिवार) बनवला आहे. यांचे म्हणजे 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' अशी परस्थिती आहे, अशी खरमरीत टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे.

राजनाथ सिंह (Rajnath Singh) गुरुवारी नगर जिल्हा दौर्यावर असून शिर्डीमध्ये साई दर्शनानंतर त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जयंती सोहळा आणि त्यानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय साहित्य-कला गौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश करत असलेली प्रगती, सहकारात पद्मश्री विखे पाटील यांनी केलेले संघटन, साखर साखळी याची दखल घेत केंद्र सरकारने अमित शाह यांच्या अंतर्गत सुरू केलेले सहकार खाते, विखे परिवाराने राजकारण, समाजकारण्यासह साहित्य क्षेत्रात सुरू केलेला पुरस्कार आदींची चर्चा केली.

मुंबईत 'इंडिया' आघाडीची दोन दिवसीय बैठक होत असताना राज्यात आलेले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे विरोधी पक्षांवर काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. हा विषय छेडताना राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पाहत आज मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचा उल्लेख केलाच. अगदी मराठीत त्यांनी विरोधकांनी 'इंडिया' नाव घेतल्या बद्दल 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' अशी टिपण्णी करत विरोधकांच्या एकतेला हा एक पारिवारिक 'कुनबा' असल्याचे संबोधत खिल्ली उडवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था वेगाने आगेकूच करत आहे. विविध क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. 'अवघे विश्वची माझे घर' हा देशाचा मूलमंत्र आहे. शेती, सहकार, श्रमिक, कामगार, उद्योजक अशी आपली यशस्वी साखळी बनली असल्याने जगाच्या नकाशावर आज भारत एक महत्वपूर्ण देश बनला आहे. भारत काय म्हणतो याकडे जगाचे लक्ष लागून असते. ही सर्व प्रगती गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने केली आहे, असे सांगत विरोधी पक्ष सरकारवर करत असलेल्या विविध आरोपांना उत्तर दिले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT