Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : 'हुकूमशाही मोडण्यासाठीच शिवसेनेचे नाशिकला अधिवेशन'

Arvind Jadhav

Nashik News : देशात हुकूमशाही सुरू आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून स्थानिक पोलिसांनी अडवले. ही सरकारी गुंडागर्दी असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. देशातील अशी हुकूमशाही मोडून काढण्यासाठीच नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन भरवले गेले. देशातील लोकशाही वाचवण्याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी पार पडणार असून, अधिवेशनानंतर ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी संजय राऊत नाशिकमध्ये दाखल असून, सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधला. आसाममधील नागाव येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून स्थानिक पोलिसांनी अडविले. भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारी सुरक्षिततेत काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुंडागर्दी केली.

राहुल गांधी यांनी पोलिसांच्या या कृतीचा जोरदार निषेध केला. मात्र, ही बाब सरकार म्हणून कशी खपवून घेतली जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करीत ही हुकूमशाही सुरू असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. देशात लोकशाही राहिलेली नाही. हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. सरकार पुरस्कृत गुंडांनी राहुल गांधीना अडवले. याच हुकूमशाही विरोधात शिवसेना लढते आहे. श्रीरामांच्या संघर्षाची सुरूवात नाशिकमधून झाली होती. केंद्र सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी नाशिकला अधिवेशन भरवण्यात आल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राजकीय प्रचार संपला की अयोध्येला जाणार

भाजपाने लोकसभेच्या प्रचाराची थेट सुरुवात केली आहे. अयोध्येचे राम मंदिर देशवासीयांचे आहे. मात्र, भाजपाने या धार्मिक सोहळ्याला राजकीय स्वरूप दिले. हा राजकीय इव्हेंटच ठरला आहे. त्यामुळे भाजपाचा अयोध्येतील राजकीय प्रचार संपला की आम्ही दर्शनाला जाऊ, असे राऊत म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT