Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat On BJP: भाजपची अस्वस्थता आणखी वाढणार ? बाळासाहेब थोरातांनी केला मोठा दावा

Congress and BJP: जनता हुशार झाली, भाजपचा निश्चिंतपणा जनता आरामात बदलणार, बाळासाहेब थोरातांचा टोला

Pradeep Pendhare

Ahmednagar News: राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादाचा भारतीय जनता पक्षावर आगामी काळातील निवडणुकीत कोणताच प्रभाव पडणार नाही, असा सर्वे सांगत आहे. त्यामुळे भाजप निवडणुकांबाबत निश्चिंत असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे.

'भाजपचा हा निश्चिंतपणा म्हणजे अस्वस्थता आहे. भाजपची अंतर्गत काय पडझड झाली आहे, हे त्यांनाच माहित. जनता त्यांना यावेळी उभी देखील करणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकालानंतर भाजपची अस्वस्थता आणखीच वाढणार आहे', असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात आज संगमनेरमध्ये होते. मतदारसंघातील लोकांशी गाठीभेटी घेत होते. काही ठिकाणी संवादाचे छोटोखानी सभेत रुपांतर होत होते. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. काही नेते भडकावू विधान करत आहेत. राज्यात अस्थिरता आली आहे. दिवाळीनंतर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. भाजपने सर्वेक्षणावर भर दिला आहे. ग्रामपंचयातीच्या निवडणुकानंतर भाजप 45 प्लसचा नारा देत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाच्या वादाचा परिणाम भाजपवर होणार नाही. लोकसभा आणि विधानसभेत भाजप प्लसच राहिल, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसे सर्वेचे दाखले दिले जात आहे. मराठा आणि ओबीसीची मते हे भाजपलाच मिळतात. त्यामुळे या वादाचा दुरान्वये देखील परिणाम भाजपवर होणार नाही. आरक्षणावरून कितीही वाद झाले, तरी त्याचा राग मतावर निघत नसतो, असाही दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे.

यासाठी भाजपकडून काही जुने दाखले दिले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे 2018 मध्ये मुख्यमंत्री असताना मराठा आंदोलन अतिशय प्रखर होते. यातच महाराष्ट्रातील काही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका होत्या. यात भाजपचे नेते प्रचाराला न जाता देखील चांगली कामगिरी केल्याचे उदाहरणे पुढे केली जात आहे. भाजपशिवाय पर्याय नाही, असे म्हटले जात आहे.

राज्यात ग्रामपंचायतीच्या निकालाचा देखील दाखला भाजपकडून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकात पक्ष चिन्हावर लढल्या नसल्या, तरी भाजप नेत्यांचे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात भाजप निवडणुकांमध्ये एक क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यातून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रभाव लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर न पडता भाजपचेच पारडे जड राहिल, असे सांगितले जात आहे.

काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या या निश्चिंतपणावर टोमणा मारला आहे.'भाजप वरकरणी निश्चिंतपणा दाखवत आहे. परंतु ते आतून अस्वस्थ आहेत. काही निश्चिंत वैगेरे नाहीत. मग सर्वे घेण्याचे कारण काय? सर्वेवर विश्वास ठेवण्याचे कारण काय? त्याचा गवगवा करण्याचे कारण काय? सर्वेच्या नावाखाली जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार भाजपकडून सुरू आहे. परंतु आता जनता हुशार झाली आहे. त्यांचा निश्चिंतपणा जनता आरामात बदलणार आहे, हे मात्र निश्चित झाले आहे', असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT