Shirdi Sai Temple Murder : साईबाबा समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर भयंकर हत्याकांड घडल्याने शिर्डी हादरली आहे. मंदिर परिसरात धार्मिक स्टिकर, फळे विक्री करणाऱ्या महिलांच्या दोन गटात हा वाद उफाळून हे हत्याकांड झाले आहे.
फळ विक्रेत्या महिलेवर चाकूचे सपासप वार करून हत्या झाली. जयश्री साईनाथ क्षीरसानगर (वय 30) अशी हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शिर्डीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, होमग्राऊंडवर झालेल्या या हत्याकांडावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मौन सोडले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "शिर्डीतील (Shirdi) घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी, अशीच आहे. भर चौकात ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक तिथे होते. पाहत होते. पण कुणीही पुढे येऊन घटना थांबवली नाही. का कोणी पुढे आले नाही?" पोलिसांनी प्रत्येक माणसामागे उभे राहावं अशी अपेक्षा आहे का? असा सवाल त्यांनी केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना पूर्ण स्वातंत्र दिले आहे. शिर्डीच्या प्रकरणामुळे आता रस्त्यावर, फुटपाथवर विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. शिर्डी शहरातील हॉटेल आणि दुकानदारी किती वाजेपर्यंत चालवायची याबाबत देखील मी प्रशासनाला निर्देश दिलेत. त्यानुसार पुढील काळात कार्यवाही होईल, असे मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाला कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्यात. कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. संघटित गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. ज्या लोकांना शिर्डीत राहण्यासाठी जागा दिल्यात, ते लोक गुन्हेगारीकडे वळलेत. शिर्डी शहरातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढे येऊन माहिती देणं गरजेचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी गावठी पिस्तूल सापडलेत, पारनेर तालुका गुन्हेगारीचा अड्डा होत चालला आहे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
शिर्डीच्या साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर भर गर्दीत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री साईनाथ क्षीरसागर (30 वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन फळ विक्रेत्या महिलांना शिर्डी पोलिसांनी अटक केली.
मंदिर परिसरात वर्दळीवेळी चार ते पाच महिलांनीच मयत जयश्री क्षीरसागर यांना घेरत, धारदार चाकूने वार केले. भररस्त्यात आरोपी महिलांनी जयश्री यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अंजली खांडीझोड (वय 22) आणि फिजा पटेल (वय 21) या दोन महिला आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिर्डीत आता युवकांच्या टारगट टोळक्यांसह महिलांचा गुंडाराज सुरू झाला का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.