Ahmednagar Municipal Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Thackeray Party : विकासकामं ओव्हर एस्टीमेट, श्वेतपत्रिका काढा; नाहीतर.., ठाकरे पक्षाचा आयुक्तांना इशारा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अहमदनगर शहरात गेल्या 5 ते 7 वर्षात विविध विकासकामे झाली असून, ती ओव्हर एस्टीमेट करून घेतल्याची शंका व्यक्त होत आहे. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला.

या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने महापालिका आयुक्तांकडे केलीय. शिवसेना ठाकरे पक्षाने विकास कामांबाबत घेतलेल्या या पवित्रामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष अधिक पेटणार, असे दिसते.

शिवसेनेचे (Shiv Sena) गिरीश जाधव यांनी आयुक्तांना याबाबत निवेदत देत आठ दिवसात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली आहे. हा अल्टीमेटम समजा, असे म्हणत श्वेतपत्रिका न काढल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिला. आयुक्तांकडे श्वेतपात्रिका काढण्याच्या मागणीत, गिरीश जाधव यांनी अहमदनगर शहरात झालेल्या विकास कामांबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत.

अहमदनगर शहरात विकास कामांचा बोलबाला चालू आहे. शहर बदलते आहे, असे सांगितले जात आहे. महानगरकडे वाटचाल होते आहे, अशा वल्गना करून नगरकरांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. अहमदनगर शहरात जी रस्ता काँक्रिटीकरणाची कामे चालू आहेत, त्याबाबत गिरीश जाधव यांनी उणिवाकडे लक्ष वेधले आहे.

काँक्रिटीकरण रस्ते (Road) सरसगट दीड फूट जाडीचे केले जात आहेत. बांधकाम विभागाच्या नियमानुसार काँक्रिट रस्ता सहा इंच जाडीच्या पेक्षा जास्त असेल, तर त्यात स्टील टाकणे आवश्यक आहे, पण दोन-पाच वर्षात काँक्रिटीची जी रस्ते झाली आहेत, त्यात कोठेही स्टीलचा वापर झालेला दिसत नाही, त्यामुळे अशा रस्त्यांचे आयुष्य संपत चालले आहे, असे गिरीश जाधव यांनी म्हटले आहे.

नॅशनल काँक्रिट काँग्रेसच्या अर्थात 'एनसीसी'च्या कोणत्याच नियमांचा आधार घेऊन या कामांना मंजुरी देण्यात आलेली नाही. काँक्रिट रस्त्यांना कमी अधिक प्रमाणात तडे गेलेले दिसतात. तरी यांना तांत्रिक मंजुरी कुणी आणि कशी दिली याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. अहमदनगर शहरात आणि उपनगरात आतापर्यंत डांबरीकरणाचे रस्ते झाले आहेत, त्यातील बहुतांश रस्ते उखडलेत. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल गिरीश जाधव यांनी तक्रारीत केला आहे.

मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्या निर्देशानुसार अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार यांच्या काळात अहमदनगर शहरात 200 रस्ते मंजूर करून आणले. ही कामं कधी आणि कोठे झाली किंवा काम झालीच नाही का? असा प्रश्न करत महापालिकेकडून त्यावर खुलासा करावा. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर धरलेली मीठाची गुळणी सोडून द्यावी, असेही आवाहन गिरीश जाधव यांनी केले.

अहमदनगर शहरात 1000 ते 1200 कोटी रुपयांची विविध विकासकामे झाली आहेत. गेल्या 5 ते 7 वर्षात तो निधी नक्की कुठे खर्च केला. हे किमान कागदावर येणे गरजेचे आहे. याद्वारे नगरकरांची सपशेल दिशाभूल सुरू असून प्रामाणिकपणे पालिकेचा कर भरणाऱ्या रहिवाशांची अक्षरशः लूट होत आहे, असा गंभीर आरोप गिरीश जाधव यांनी केला. याबाबत महापालिकेने श्वेतपत्रिका पुढील आठ दिवसात काढावी, अशी मागणी केली. येत्या 8 दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास फौजदारी कारवाई करू, असा इशारा गिरीश जाधव यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT