Bhaskar Jadhav and Rashmi Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rashmi Thackeray: भास्कर जाधवांचं रश्मी ठाकरेंना भावनिक आवाहन; म्हणाले, 'वहिनी राजकारणात...'

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज एक आवाहन करून हजारो शिवसैनिकांना अचंबित केले. जाधव यांनी रश्मी ठाकरे यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. त्याला उपस्थितांनी देखील तेवढाच जोरदार प्रतिसाद दिला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झाली. यावेळी ठाकरे यांच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आणि एकनाथ शिंदे आणि बंडखोरांचा जोरदार समाचार घेतला. त्यांनी आपल्या आक्रमक भाषणाने आजची सभा जिंकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी समारोप करताना जाधव यांनी एक वेगळीच मागणी करून सगळ्यांना अचंबित केले. ते म्हणाले, काल गोदावरीची महाआरती झाली. त्यात अनेकांनी तेजस ठाकरे यांना पाहिले. त्यानंतर ते केव्हा राजकारणात येणार अशी विचारणा पत्रकार माझ्याकडे करत होते.

जाधव पुढे म्हणाले, तेजस ठाकरे राजकारणात यायचे तेव्हा येतील. मात्र मला पुण्याच्या एका काँग्रेस नेत्याचे वक्तव्य आठवले. हे नेते म्हणाले होते, मला आदित्य ठाकरे आवडतात. त्याचे कारण ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून नव्हे किंवा उद्धव ठाकरे यांचे पुत्र म्हणून नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून चाळीस आमदारांनी गद्दारी केली. हे चाळीस लांडगे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करत होते. त्याला आदित्य ठाकरे यांनी वाघासारखी लढत देऊन ते मदतीला आले, म्हणून मला आवडतात. तेजस ठाकरे देखील वाघाचे बछडे आहेत. ते राजकारणात येतील तेव्हा येतील.

जाधव पुढे म्हणाले, माझ्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे. तेथील महिलांनी मला रश्मी ठाकरे यांनी घराबाहेर पडले पाहिजे, असा आमचा निरोप द्या असे सांगितले. एका वर्तमानपत्रात आलेल्या लेखांमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई, शंकरराव चव्हाण यांच्या पत्नी आणि विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई यांच्यासारख्या शांत, संयमी आणि महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे वर्तन असलेल्यांमध्ये रश्मी वहिनी यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांनी घराबाहेर पडले पाहिजे, असे माझे आवाहन आहे.

जाधव यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब यांचा संदर्भ दिला. व्यासपीठावर जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे धगधगते कुंड प्रज्वलित होत असे, तेव्हा मासाहेब समोर चंद्राच्या शीतलतेप्रमाणे शांत बसून असत. आज रश्मी वहिनी देखील अशाच प्रतीत होत आहेत. शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे.

पक्षाशी गद्दारी झाली आहे. याचा बदला घ्यावाच लागेल. त्यासाठी तुम्ही देखील घराबाहेर पडले पाहिजे. राजकारणात आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनी देखील शिवसेनेच्या घोषणा देऊन जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे आजची सभा एका अर्थाने भास्कर जाधव यांनी जिंकली. रश्मी ठाकरे यांना राजकारणात येण्याचे आवाहन करून चर्चेचा विषय ठरले.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT