Shivsena Morcha In Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Politics : शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेने दाखवला महायुतीला आरसा!

Sampat Devgire

Maharashtra Politics : एकीकडे भारतीय जनता पक्षाचा तीन राज्यातील निवडणुकांतील विजयाचा जल्लोष सुरू असतानाच शिवसेनेने मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शक्तीप्रदर्शन केले. शिवसेनेने आपली ताकद दाखवत पुढील राजकारणाची चाहूल दाखवली आहे. (Nashik Shivsena deemands immediate relief for affected Farmers)

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे (Affected Farmers) मोठे नुकसान झाले. यासंदर्भात विरोधी पक्षांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरले आहे. शिवसेनेने (Shivsena) यासंदर्भात शहरात मोठा मोर्चा काढला. एकीकडे भाजपचा (BJP) विजीय जल्लोष दुसरीकडे शिवसेनेचा मोर्चा असे चित्र शहरात होते.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने विनाविलंब आणि सरसकट मदत तसेच कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातर्फे बैलगाडी- ट्रॅक्टर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांसह काढलेल्या या मोर्चातून शिवसेनेने राजकीय शक्तीप्रदर्शन करीत आपली ताकद दाखविली.

शिवसेनेच्या शालीमार येथील कार्यालयापासून सुरू झालेल्या मोर्चात २५ बैलगाड्यांसह अनेक शेतकरी, त्याच्या ट्रॅक्टरसह सहभागी झाल्याने मोर्चा लक्षवेधी ठरला. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार सर्वश्री अनिल कदम, निर्मला गावित, योगेश घोलप तसेच कुणाल दराडे, देवानंद बिरारी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने विविध तालुक्यांत मोठेो नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना सावरणे कठीण आहे. त्याला दिर्घ कालावधी लागेल, त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. राज्य सरकारने याबाबत काहीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत, सरकार व विमा कंपन्यांचा फोलपणा मांडला. एक रुपयात पीक विमा योजनेत विमा काढूनही शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही. अवकाळी पाऊस झाल्याचे विमा कंपनीला माहीत असून सुद्धा शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका विमा कंपनीची दिसत नाही. नुकसानीबाबत ७२ तासाच्या आत विमा कंपनीला ऑनलाईन किंवा फोन द्वारे कळवावे असे सांगितलेले आहे. मात्र या कंपनीची वेबसाईट बंद आहे.

संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्कच होत नाही. विमा कंपनी हेतुपुरस्सर दिलेले नंबर आणि वेबसाइट बंद ठेऊन विमाधारक शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याबाबत संबंधीत विमा कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५०,००० मदत जाहीर करावी, दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी, चारा उपलब्ध करून देण्यात यावा, पिकविम्यातील जाचक अटी रद्द कराव्यात यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT