Ambadas Danve at Nandgao
Ambadas Danve at Nandgao Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ambadas Danve News : सुहास कांदेंच्या मतदारसंघात अंबादास दानवेंचे सरकारविरोधी षटकार!

Sampat Devgire

Shivsena Nandgaon News : गेले काही दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. घोषणा होऊनही राज्य शासनाची मदत मिळालेली नाही. या विरोधकांना अनुकूल स्थितीचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच फायदा घेतला. त्यांनी थेट शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. (Leader of opposition Amabadas Danve visit affected farmers farms at Nandgaon)

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे जिल्ह्यातील (Nashik) शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व जाचक अटी, निकष बाजूला ठेऊन मदत करण्यासाठी मुख्यमंत्री, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena) यांनी दिली.

बुधवारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघातील घाटमाथ्यावर जातेगाव, बोलठाणसह परिसरात रविवारी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची श्री. दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत बळिराजाचे सांत्वन करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना श्री. दानवे म्हणाले, की जिल्ह्यातील चांदवड, मनमाड, नांदगाव तालुक्यात कांदा, टोमॅटो, मका, बाजरी आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने नुकसान झाले असून शेतकरी संपूर्ण उद्धवस्त झाला आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाने सर्व निकष, जाचक अटी बाजूला सारून पंचनाम्याची वाट न बघता मदत करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना भेटून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच लाल कांद्याला प्रती क्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले असून त्यासाठी सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पीकपेरा असणे गरजेचे आहे. एका शेतकऱ्याला २०० क्विंटल कांद्यासाठीच अनुदान देण्यात येणार असल्याचे या सरकारने जाहीर केली आहे. मात्र अशी अट टाकून शेतकऱ्यांची शासनाने एक प्रकारे थट्टा केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील लाल कांदा पिकवला व बाजार समितीमध्ये विकला त्यांच्याकडे शेताचा उतारा आहे. त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ऑनलाइन नोंद असो किंवा नसो त्यांना मदत मिळालीच पाहिजे. परंतु सरकार किचकट अटी शर्तीमध्ये शेतकऱ्यांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहे.

यामध्ये स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांची काही चूक नसते. कारण अशा अस्मानी संकट येते त्यावेळी शासनाने त्यांना राज्यातील कोणत्या भागातून किती टक्के नुकसान दाखवायची याबाबत सूचना देण्यात आलेल्या असतात. नाशिक जिल्ह्यातील गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून अतिशय भयंकर प्रकार घडला आहे. याप्रकरणी विधानपरिषदेत शेतकरी बांधवांना तत्काळ भरीव मदत करावी अशी मागणीही करणार आहे.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नहार, संतोष बळीद, संजय कटारिया, प्रवीण सूर्यवंशी, विजय मिश्रा, बाळासाहेब चव्हाण, अमित नहार, राजेंद्र सोनवणे, रामदास पाटील, आयुब शेख, नाना थोरात, शिवसेना तालुकाप्रमुख संजय मोटे (कन्नड), जालिंदर गायकवाड, अजय जाधव, बाबासाहेब शिंदे, सरपंच पंढरीनाथ कदम, ज्ञानेश्वर बोरसे, बळिराम बोरसे आणि शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT