Aditya Thakre & 200 years old banyan tree
Aditya Thakre & 200 years old banyan tree Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धक्कादायक...आदित्य ठाकरेंच्या कारवाईनंतर हरकतींचा पाऊस

Sampat Devgire

नाशिक : मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी २०० वर्षापूर्वीचा वटवृक्ष तोडावा लागणार होता. त्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी हस्तक्षेप करीत पर्याय शोधण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर या विषयावर नागरिकांकडून तक्रारीचा पाऊसच पडला आहे. त्यामुळे या विषयावर राजकारण करणारे शिवसेना, (Shivsena) भाजपचे (BJP) नेते निवडणुकीच्या तोंडावर हिरमुसले आहेत.

कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीवर हरकती मागविण्यात आल्या. त्यावर अवघ्या दोनच दिवसांत दोन हजार २७५ हरकती दाखल झाल्याने वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेशानंतर महापालिकेला वृक्ष व प्राधिकरण समितीच्या परवानगीची आवश्‍यकता भासल्याची बाब समोर आली असून, निविदेपूर्वी ५८८ झाडांच्या तोडीचा प्रस्ताव का आला नाही, यावरून प्रशासनाविरोधात संशय वाढला आहे. दुसरीकडे प्रस्तावाची फाइल गायब झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उड्डाणपूल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार आहे. बांधकाम विभागाने सादर केलेल्या अहवालामध्ये ५८८ वृक्षांची तोड केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तोड होणाऱ्या वृक्षांमध्ये हेरिटेज दर्जा असलेले जुने वृक्षही तोडले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने झाडांवर नोटीस चिपकावल्याने पर्यावरणप्रेमींचा संताप उसळला. गेल्या तीन दिवसांपासून झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी मोहीम चालविली आहे. वृक्षतोडीविरोधात हरकती व सूचना मागविल्या आहेत. उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार १०० ऑनलाइन हरकती, शंभर हरकती आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे, तर १७५ लेखी हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

वरातीमागून घोडे

उड्डाणपुलासाठी वृक्षतोड होणार आहे. त्यासाठी पुलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी वृक्षांची तोड करण्यासाठी समितीची संमती आवश्‍यक आहे; परंतु संबंधित ठेकेदाराला कामाचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अद्यापही वृक्ष प्राधिकरण समितीवर वृक्षतोड मंजुरीसाठी प्रस्ताव आला नाही. त्यामुळे वृक्षतोडीला परवानगी नसताना ठेकेदाराला कार्यारंभ आदेश का दिले, असा सवाल उपस्थित करताना बांधकाम विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

पूल होणारच, अभियंत्यांकडून पाहणी

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून वृक्षतोड न करता पुलाची संरचना बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वृक्ष न तोडता उड्डाणपूल उभारता येईल का, या संदर्भात शहर अभियंता नितीन वंजारी व आर. एस. पाटील यांनी स्थळपाहणी केली. त्यानुसार वृक्षतोड न करता केवळ फांद्या तोडण्याचा पर्याय स्वीकारण्यात आल्याची माहिती देताना आयुक्त जाधव यांनी पुलाच्या कामावर ठाम असल्याचे स्पष्टोक्ती दिली.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT