Shriram Shete & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: शरद पवार समर्थक शेटे आणि मंत्री भुजबळ यांच्यात 'या' विषयावर झाले एकमत?

Sampat Devgire

Bhujbal, Shete News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांनी बुधवारी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता स्वतः श्री शेटे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ आणि शरद पवार यांचे सहकारी श्रीराम शेटे यांच्यात काल चर्चा झाली होती. भुजबळ फार्म येथे या दोन्ही नेत्यांनी बंद दारावर अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता.

आता याबाबत श्री शेटे यांनीच माहिती दिली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र राजकारणाचा विषय ठरेल अशा नार-पार पाणी प्रश्नावर या दोन्ही नेत्यांमध्ये गंभीर चर्चा झाली.

महायुती सरकारने नुकतीच नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने पार नदी आणि गिरणा यांच्यात वळण बंधाऱ्यांद्वारे १०.६२ टीएमसी पाणी धुळे आणि जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये नार ही नदी गोदावरी खोऱ्याशी निगडित आहे.

नार नदीचे पाणी वळवून नाशिकच्या आणि विशेषतः दुष्काळी भागासाठी सिंचन योजना राबविणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संबंधित संस्था आणि राजकीय नेते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच नारपार गोदावरी खोऱ्याच्या प्रकल्पाची चर्चा शेटे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चर्चा झाली.

मांजरपाडा आणि वाघुरपाडा या प्रकल्पातून नार नदीचे पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे गोदावरी खोऱ्यात आणणे अपेक्षित आहे. केमचा डोंगर येथून हे पाणी दिवसाने गाव ते पायथ्यापर्यंत पाटाने आणता येईल. त्यात केम डोंगराचा पायथा ते अहिवंतवाडी, सप्तशृंगी गड, मार्कंडेय किल्ला, चांदवड तालुक्यातील धोडंब किल्ला, चंद्रेश्वरी मार्गे तो येवला या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचवू शकतो.

या प्रकल्पातून दिंडोरी तालुक्याचा उत्तर भाग आणि चांदवड, नांदगाव, येवला या नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी पोहोचविणे शक्य आहे. मात्र राज्य सरकारने या प्रकल्पाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चांदवड नांदगाव येवला या तालुक्यांमध्ये अस्वस्थता आहे.

या विषयावर नांदगाव तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी देखील एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. खासदार भगरे यांनी केंद्रीय जल संसाधन मंत्री आरसी पाटील यांना नार-पार प्रकल्प मंजूर करण्याबाबत पत्र लिहिले होते.

मात्र केंद्रीय मंत्री आर. सी. पाटील यांनी गुजरातकडे वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाकडे वळविण्याबाबतच्या प्रकल्पाला मंजुरी शक्य नाही असे कळविले. त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी देण्यास नकार दिला होता. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यावर राज्यातील महायुती सरकारकडून पाण्याबाबत मोठा अन्याय होऊ घातला आहे.

त्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागातील सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी वळविण्याचा प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यावर आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत आहे. त्या संदर्भात राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केल्याचा खुलासा श्री शेटे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT