Anandacha shidha pack
Anandacha shidha pack Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आनंदाचा शिधा... शिंदे सरकारच्या घोषणेतील गोडवा गायब!

Sampat Devgire

जळगाव : मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने ‘आनंदाचा शिधा’ (Diwali ration pack) योजनेची घोषणा केली होती. मात्र दिवाळी सरल्यावर देखील सर्व नागरिकांना तो मिळाला नाही. आता तर जिल्ह्यात (Jalgaon) त्यातून साखर (Sugar is missing) गायब झाली आहे. त्यामुळे दिवाळ सणाच्या या शिध्यातील गोडवा हरवल्याची प्रतिक्रीया गरीबांनी व्यक्त केली आहे. (There is no sweetness in Diwali ration pack)

राज्य शासन रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ‘दिवाळी किट’ (आनंदाचा शिधा) शंभर रुपयांत देत आहे. मात्र दिवाळी किट वाटपातील घोळ मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. कधी रेशन दुकानावर पिशव्या येत नाहीत, कधी पामतेल, साखर पोचत नसल्याचे प्रकार घडत आहेत.

मंगळवारी शहरातील काही रेशन दुकानांवर साखर असूनही ती ‘गायब’ झाल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांनी केल्या. यामुळे आनंदाचा शिधावाटप योजना वांध्यात सापडली आहे. शहरातील अनेक रेशन दुकानांतून मंगळवारी साखर न मिळाल्याने शिधापत्रिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात सत्तांतर झालेल्यानंतर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना शासनाकडून नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो हरभराडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट) शंभर रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी या किटमधील जिन्नस रेशन दुकानदारांपर्यंत पोचल्या होत्या. मात्र या योजनेचे लाभार्थी सहा लाख २० हजार अन् पिशव्या आल्या आहेत केवळ ४२ हजार. त्यानंतर पिशव्यांअभावी दिवाळी किटची वाटप रखडले होते. नंतर पिशव्या आल्या. मात्र कधी साखर, कधी तेल आलेल्या नसल्याच्या तक्रारी रेशनकार्डधारकांनी केल्या. यामुळे काही लाभधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा मिळू शकला आहे.

शहरातील अनेक रेशन दुकानांतून मंगळवारी साखर मिळत नव्हती. केवळ रवा, हरभराडाळ, पामतेल अशा वस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. केवळ तीन वस्तू घेऊन जा, असे रेशन दुकानदार सांगत आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळीपूर्वी जाऊन ई-पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करून शिधाजिन्नस संच प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. असे असताना केवळ तीनच वस्तू मिळत असून, ई-पॉस मशिनवर अंगठाही घेत आहेत. मग साखरेचे काय? साखर गायब करण्यात आली आहे, असे रेशन कार्डधारकांनी सांगितले.

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. रेशन दुकान संघटनेचे अनिल अडकमोल यांना याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT