Uddhav Thackeray, Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Samant : 'ठाकरेंवर सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो ॲक्शन घ्यावी'; उद्योगमंत्री असं का म्हणाले?

Sampat Devgire

Nashik News, 03 Oct : महाराष्ट्र गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार होतो आहे. आगामी काळातही घोडदौड सुरूच राहील, असं वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं आहे.

ते नाशिक येथे बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या कामकाजाबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप केला. तसंच विशेषता उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली झाली असून महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर असतानाही विरोधक फेक नरेटिव्ह सेट करत आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. विरोधकांना आम्ही योग्य उत्तर देऊ, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. उदय सामंत म्हणाले, राज्यातील गुंतवणूक आणि उद्योगाबाबत विरोधक वारंवार अपप्रचार करतात म्हणून राज्य शासनाने श्वेतपत्रिका काढली. श्वेतपत्रिका काढल्यावर विरोधकांना तोंड देखील उघडता आलं नाही. श्वेतपत्रिकेबाबत कोणताही आरोप ते करू शकलेले नाहीत. या वस्तुस्थितीकडे जनतेने लक्ष द्यावं.

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल लांबला आहे. त्याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे प्रमुख ठाकरे सातत्याने सर्वोच्च न्यायालयावर टीका करतात. त्याचाही सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, अशाप्रकारे वारंवार न्यायालयाचा अपमान करण्यात येत आहे. हे पाहून खंत वाटते. त्यामुळे अशा प्रकरणात आता न्यायालयाने सुमोटो कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे आता ठाकरेंकडून सर्वोच्च न्यायालयावर अविश्वास दाखविण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालय स्वतःहून काय भूमिका घेणार? हे पहावं लागेल, असेही सामंत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पक्षाकडून दहा टक्के मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा याबाबतचे स्वतंत्र आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणजे आम्ही त्याचे अनुकरण केलेच पाहिजे, असे बंधनकारक नाही. आमच्याकडे आधीच अब्दुल सत्तार हे अल्पसंख्यांक मंत्री असल्याचं सामंतांनी सांगितलं.

नाशिकमध्ये लवकरच एक मोठा प्रकल्प येईल, असा दावा उद्योगमंत्र्यांनी केला. राज्यातील महिंद्राचा इलेक्ट्रिक व्हेईकलचा चीनशी संबंधित एक मोठा प्रकल्प गुजरातला स्थलांतरित झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामंत यांना विचारले असता, त्यांनी अशी कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. ते म्हणाले नाशिकमध्ये महिंद्रा प्रकल्पाचा विस्तार होणार आहे. तो अन्यत्र कुठे जाणार नाही. डिफेन्स ऑटोमोबाईल हब म्हणून नाशिक मध्ये त्यावर आधारित एक मोठा उद्योग येण्याची देखील शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT