Narendra Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : येत्या 4 जूनला भाजपमध्ये फूट पडणार; नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

Sachin Waghmare

Nashik News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लवकरच लागणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागल्यानंतर भाजपमध्ये उभी फूट पडणार असल्याचा मोठा दावा नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर शेलक्या शब्दांत टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुधवारी नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप (Bjp) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanatg Shinde) यांच्यावर सडकून टीका केली. (Uddhav Thackeray News)

“विषय अनके आहेत. किती विषयांवर किती बोलायचं? पण काही गोष्टींवर आवर्जून बोलणं भाग आहे. मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते. आता त्यांच्या खरंच मनावर एवढा ताण पडलाय, मध्ये कोणीतरी सांगितलं की, ते झोपतच नाही. झोपलं नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखं बोलायला लागतात. मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल, स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात”, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

“हिंदू हृदयसम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि तेलंगणाच्या भाषणात हे मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट मागितलं? आणि तेवढी तुमची लायकीपण नाही. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे.

त्यांना प्रश्न असा पडलाय, संपूर्ण फौज मोदींच्या बाजूने आहे, भाजपची तीनपाटापासूनची मोठी भांडीकुंडी वाजणारी त्यांच्याकडे आहेत, पण तरीही ते उद्धव ठाकरेला घाबरतात, कारण जनतेच्या रुपाने माझ्याभोवती शिवसेनाप्रमुख आणि माझ्या माँ साहेबांचं आशीर्वादाचं कवच आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निमित्ताने प्रफुल पटेल यांना सांगतो, पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यावर माझ्या महाराजांचा जिरेटोप ठेऊ नका. मोदींची माझ्या महाराजांसोबत बरोबरी करायची पात्रता काय? महाराजांचं राज्य कसं चालत होतं? कुणी महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथे हातपाय तोडायचे. मग तो कुणीही असेल.

मोदी काय करताय? मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. तिकडे जातच नाहीत. तिकडे जायची हिंमत नाही. ना मोदींची, ना अमित शाह यांची. मोदी तुम्ही जाऊ शकत नाहीत महाराजांच्या जिरेटोपाला हात काय, तुमची जिरेटोपचं दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सुनावले.

SCROLL FOR NEXT