Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar: भावी मुख्यमंत्री असलेले सारेच चौकशीच्या फेऱ्यात; प्रकाश आंबेडकरांनी काढला चिमटा !

सरकारनामा ब्यूरो

Political News: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करत टीका केली आहे. "बापात बाप नाही आणि लेकात लेक नाही", अशी परिस्थिती असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने सर्वात अगोदर जागा वाटपावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

"उगाच जागा वाटपाचं घोंगड भिजत ठेवून उपयोग नाही. पण आघाडीतील तिन्ही पक्ष जागा वाटपाऐवजी मुख्यमंत्री आमचाच, यावर जास्त भर देत आहेत. त्या पद्धतीचा एक छुपा गेम सुरू आहे", असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते.

"सध्या ज्या-ज्या लोकांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसून येत आहेत, त्यांच्यावर कुठली ना कुठली चौकशी सुरू असणारे असेच चेहरे आहेत आणि तेच दावे करत आहेत, असा चिमटाही आंबेडकर यांनी काढला.

शेवगावच्या दंगलीची सीआयडी चौकशीची मागणी

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नगरमधील शेवगाव शहरात झालेल्या धार्मिक दंगलीच्या अनुषंगाने पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप केला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील नेते प्रा.किसन चव्हाण यांच्यावर ते छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचा पुरावा असतानाही आरोपी केले, याची तक्रार आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करत दंगलीची सीआयडी चौकशीची मागणी केली.

भाजप शिंदे गट निवडणुका एकत्र लढणार?

भाजप आणि शिंदेंची शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपशी केलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडून काँग्रेससोबत गेल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे आणि तोच त्यांच्यात वाद आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट येणाऱ्या निवडणुका एकत्रच लढणार, असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

ठाकरेंच्या पक्ष नाव नोंदणीबाबत आंबेडकरांचं भाष्य

आता उद्धव ठाकरे यांना पक्षाच्या नावाबद्दल रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे, ही प्रक्रिया सुरू केली असे मी मानतो, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे ठाकरे गटाने नवीन नावासह आपल्या पक्षाचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केलं असल्याचं सुतवाच प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

लव जिहादबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्रातील जवळपास 35 हजार महिला गायब झाल्या असून आता सध्या त्याला लव जिहादचे नाव पुढे करत त्यावर राजकारण सुरू असल्याची टिप्पणी आंबेडकर यांनी केली. या प्रकाराला सरसकट लवजिहाद नाव देणे हे योग्य ठरणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केलं. प्रेम प्रकरण ही वयक्तिक बाब आहे. ती दोन्हीही धर्माच्या बाजूने होत असते, असे ते म्हणाले.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT