Balasaheb Thorat-Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Vs Thorat : ‘समन्यायी’ पापाची जबाबदारी तुमचीच; विखेंनी डागली थोरातांवर तोफ!

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : यंदा कमी पर्जन्यमानामुळे नगर-नाशिक जिल्ह्यांतील जायकवाडीला जाणाऱ्या पाण्यावरून विभागीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पूर्वीच नगर जिल्ह्यात आतापासूनच समन्यायी पाणी धोरणाला जबाबदार कोण यावरून विखे-थोरात या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एकमेकांना जबाबदार धरत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. 'प्रवरा' साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विखेंनी समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या पापाची जबाबदारी टाळता येणार नाही, असे सूचक वक्तव्य केले आहे. (You are responsible for sin of equitable water distribution: Vikhe's criticism of Thorat)

ज्यांनी एकेकाळी समन्यायी पाणीवाटप कायद्याचे विधेयक सभागृहात मांडून समर्थन केले आणि नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी सोडण्यास हातभार लावला, आज तेच पाणी सोडण्यास विरोध केल्याची भाषा करू लागले आहेत. जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविलेल्या या कायद्याच्या पापाची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही, असा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केला आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना विखेंनी हा आरोप केला. ते म्हणाले की, यंदा धरणे भरली असली तरी पावसाची चिंता संपलेली नाही. मराठवाड्याला पाणी देण्याबाबतची टांगती तलवार आपल्यावर कायम आहे. ज्यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले तेच आता मी पहिल्यांदा विरोध केल्याची भाषा बोलू लागले आहेत. याचे आश्चर्य वाटते. परंतु, पाणी सोडण्याला तुम्ही समर्थन दिले हा इतिहास का विसरता, असा सवाल करून 'जाणत्या राजा'च्या उपस्थितीत पाणी सोडण्यास दिलेल्या मान्यतेचे दाखले विखेंनी सूचकपणे दिले.

बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच जायकवाडीला 'समन्यायी' नुसार पाणी द्यावे लागत असताना संगमनेर तालुक्याने सर्वप्रथम विरोध केला. तालुक्यात बंद पाळत आंदोलने केली, त्यावेळी नगर जिल्ह्यातील इतर नेते गप्प होते, असा आरोप उत्तरेतील विखेंसह इतर नेत्यांवर केला होता. थोरातांच्या आरोपाला नुकतेच श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही नाव न घेता थोरातांना 'समन्यायी पाणीवाटप' धोरणाला थेट जबाबदार धरत टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT