Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vivek Kolhe Vs Ashutosh Kale : 'असत्याची चादर पांघरून बसलेत, ती योग्य वेळी फाडू'

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षणात आमदार आशुतोष काळे कमी पडल्याचा घणाघात युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला. त्याचा परिणाम थेट कोपरगांवकरांना भोगावा लागणार आहे, असे म्हटले आहे.

'शेती पाण्याची तूट होऊन, आवर्तन कमी होण्याचा धोका वाढला आहे. शेती उद्धवस्त होण्याची शक्यता असताना आमदार काळे यावर विधिमंडळात गप्प बसतात. सध्या ते असत्याची चादर पांघरून बसलेत, ती योग्य वेळी फाडू आणि त्यांना सत्य दाखवू', असा संकल्प युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी विजयादशमी निमित्त संवाद साधताना कोपरगावमधील विविध मुद्यांवर भाष्य केले. यात दारणा गंगापूर धरणातील पाणी आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आशुतोष काळे यांची असलेल्या भूमिकेवर हल्ला चढवला.

विवेक कोल्हे म्हणाले, "उर्ध्व गोदावरी खोरे अगोदरच तुटीचे आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचे धोरण आखून पुढील काम अपेक्षित होते. सध्या पाणी नियोजनाचा अभ्यास नसल्याने ते झालेले नाही. परिणामी गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांना (Farmer) त्याची झळ बसणार आहे. शेती पाण्याची तूट होवून आवर्तन कमी होण्याचा धोका वाढला आहे". शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील 40 गावांच्या पिण्यांच्या पाण्याचेही 2.68 दशलक्ष घनमीटर आरक्षण दारणा आणि गंगापूर धरणावर टाकले असताना, आमदार गप्पच राहिले. आमदारांनी या आरक्षणावर विधिमंडळात चकार शब्द काढला नाही. विरोधक सध्या असत्याची चादर पांघरून बसलेत, योग्य वेळी त्यांना सत्यात आणू, असा खणखणीत इशारा विवेक कोल्हे यांनी दिला.

कामे कमी अन् प्रसिध्दीच जास्त

'समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप विरोधकांनी केले आणि तीन हजार कोटी विकासाच्या गप्पा ते मारत आहे. पण मतदार संघातील रस्ते, आरोग्य, पाणी, वीज याबरोबरच मुलभूत समस्यांची वाट लागली आहे, कामे कमी अन् प्रसिध्दीच जास्त हाच, उद्योग सुरू आहे. कोपरगावमधील स्मार्टसिटी विरोधकांनीच घालवली, तरीही ते आमच्यावर टीका करतात. मतदारसंघात गुन्हेगारी वाढली, भ्रष्टाचार अमाप, जवळच्या चार-दोन बगलबच्च्यांचा विकास केला आहे', असा टोला देखील विवेक कोल्हे यांनी लगावला.

विरोधकांच सोनं बेन्टेक्सच...

"काळे कुटुंबातील ज्येष्ठांचा आदरपूर्वक उल्लेख करतो, कारण ते चाकोरी सोडून टीका करणारे नाहीत. तरी देखील (कै.) कोल्हेसाहेबांवर बोलण्याआधी विरोधकांनी आपली राजकीय उंची बघावी. अन्यथा मलाही खूप काही बोलता येते. कोल्हेसाहेबांनी चोवीस कॅरेट सोन्यासारखी कार्यकर्त्यांची खाण निर्माण केली. पण विरोधकांच सोनं बेन्टेक्सच आहे, त्याची पोलखोल लवकरच करू", असा इशारा आमदार काळे यांना दिला आहे.

आमदार काळेंना 'एजन्सी' चालवते

'(कै.) कोल्हेसाहेबांनी काय केले, हे विचारणाऱ्या आमदारांनी कोपरगांव शहराच्या पाच नंबर साठवण तलावाची आणि पाचही तळ्याची जमीन दूरदृष्टी ठेवून नगरपालिकेला घेऊन दिली, याचा अभ्यास करावा. परंतु अशोकराव काळे यांनी घेतलेले धोरण मतदार संघाला मागे नेणारे होते, तिच पुनरावृत्ती विद्यमान आमदार करत आहे. चावी दिलेल्या बाहुल्यासारखे आमदार आशुतोष काळे यांचे वागणं आहे. स्वतःच्या उपजत कृतीने वागत नाही, तर त्यांना एजन्सी चालवते', अशी बोचरी टीका विवेक कोल्हे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT