Adani Vidarbha: भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या अदानी ग्रुपनं विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हे सांगताना विदर्भाच्या विकासाचं सरकारचं टार्गेटही त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीनं काम करण्यावर भर दिला जात आहे, याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील आपल्या भाषणात दिली.
फडणवीस म्हणाले, विदर्भ आणि महाराष्ट्र नवीन आर्थिक युगात प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. इथं आलेल्या २२ देशांतील राजनैतिक समुदायांचे सदस्य आणि मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो. नागपूर हे भारताचे 'झिरो माईल' शहर असून ते देशाचे खरे मध्यवर्ती केंद्र आहे. महाराष्ट्र ही भारताची आर्थिक शक्ती (Economic Powerhouse) आहे. भारतामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असताना, आता विदर्भ क्षेत्रात ऐतिहासिक सामंजस्य करार (MOUs) होत असून त्यांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होत आहे.
सौर मॉड्यूल क्षेत्रात १० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. या क्षेत्रातील सर्व गुंतवणूक नागपुरात येत असल्यानं, आता नागपूर आणि विदर्भाकडे सौर मॉड्यूलची भारतातील सर्वात मोठी परिसंस्था (Ecosystem) तयार झाली आहे. भारताचे पुढचे मोठे गंतव्यस्थान 'गडचिरोली' असेल. येत्या १० वर्षांत गडचिरोली हे देशातील सर्वात मोठे स्टील निर्मिती केंद्र बनेल. आम्हाला गडचिरोलीला 'ग्रीन स्टील' निर्मितीचे केंद्र बनवायचे आहे.
अदानी समूहाने 'कोल गॅसिफिकेशन'मध्ये (कोळसा वायूकरण) गुंतवणूक केली आहे. हा विदर्भाचा कायापालट करणारा प्रकल्प ठरेल. मुंबई आणि पुणे ही नवीन GCC केंद्रे अर्थात ग्लोबल कॅपेसिटी सेंटर्स आहेत. आता छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे GCC साठी पुढची महत्त्वाची ठिकाणे असतील. पुढील महिन्यात नागपुरात या क्षेत्रातील सर्व दिग्गजांची विशेष परिषद होणार आहे. भारताच्या एकूण डेटा स्पेस क्षमतेपैकी ५० टक्के क्षमता महाराष्ट्रात आहे. डेटा, एआय आणि सिलिकॉनवर आधारित ही नवीन अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देईल. विदर्भात आता इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) उत्पादनही सुरू होणार आहे. तसेच 'सर्कुलर इकॉनॉमी' आणि 'एअरस्पेस फ्युएल' क्षेत्रातही आम्ही वेगाने पुढे जात आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कृषी क्षेत्रासाठी आम्ही 'मिशन एआय' जाहीर केले आहे. मुंबई आता देशाची 'फिनटेक राजधानी' बनली आहे आणि पंतप्रधान मोदींचीही हीच इच्छा आहे. नागपूरच्या मध्यवर्ती स्थानामुळं भारताच्या ६० टक्के जीडीपीचा आवाका इथून गाठता येतो. नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे आणि समृद्धी महामार्गामुळे आम्ही नागपूरजवळ 'ड्राय पोर्ट्स' सुरू केले आहेत. वाढवण हे भारतातील सर्वात मोठे बंदर असेल. नागपूर ते वाढवण असा 'ॲक्सेस कंट्रोल रोड' तयार केला जाईल, ज्यामुळं नागपूरचा माल केवळ ८ तासांत बंदरापर्यंत पोहोचेल.
आता नागपूर हे वैद्यकीय आणि पर्यटन केंद्र बनलं असून आय केअर हॉस्पिटलसोबतचा सामंजस्य करार नागपूरच्या आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. नागपूर हे मध्य भारताचे 'मेडिकल हब' असून मेडिकल टुरिझमचा लवकरच विस्तार होईल. तसेच 'टायगर कॅपिटल' म्हणून पर्यटनातही मोठी संधी आहे. आमचा भर धोरणांवर आधारित विकासावर आहे. आमचे GCC धोरण देशात सर्वोत्तम आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत महाराष्ट्र सरकार बांबू, वस्त्रोद्योग, चामडे, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, फार्मा, सर्कुलर इकॉनॉमी आणि बायो-इंडस्ट्री संदर्भात भविष्यवेधी धोरणे जाहीर करणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील विकासाचा रोडमॅपच यावेळी सविस्तरपणे मांडला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.