Akola Election: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल यंदा अनिश्चिततेच्या छायेत आहे. मागील निवडणुकीत भाजपाने ८० पैकी ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदाही तीच परिस्थिती राहिल्यास भाजपाची सत्ता पुन्हा महापालिकेवर येण्याची शक्यता आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांचा सत्तेच्या गणितावर काय परिणाम होतो तसेच सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या ‘मॅजिक फिगर’साठी कुणाच्या पारड्यात किती जागा पडतात याचे चित्र निकालानंतरच (ता. १६) स्पष्ट होईल.
बहुरंगी लढती, अपक्षांची वाढती संख्या, शिवसेना व राष्ट्रवादीतील फूट आणि वंचित बहुजन आघाडीची स्वतंत्र ताकद यामुळे यंदाचा निकाल सरळसोट न राहता अधिक गुंतागुंतीचा ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘लाडक्या बहिणींची’ साथ कुणाला मिळते, याकडं राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यंदा २० प्रभागांतील ८० जागांसाठी एकूण ४६९ उमेदवार रिंगणात असून, त्यात १३२ अपक्षांचा समावेश आहे. जवळपास प्रत्येक प्रभागात तिरंगी अथवा चौरंगी लढत असल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे. या मतविभाजनाचा फटका प्रस्थापित पक्षांना बसण्याची शक्यता अधिक आहे.
विशेषतः शिवसेनेचे उबाठा व शिंदे गट तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील थेट संघर्षामुळे पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येते. भाजपाने यंदा ६२ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. संघटनात्मक ताकद आणि मागील कार्यकाळातील सत्तेचा लाभ भाजपाला मिळू शकतो; मात्र, मागीलवेळी मिळालेल्या ४८ जागा कायम राखणे हे भाजपासाठीही आव्हानात्मक ठरणार आहे. काही प्रभागांत अपक्ष व बंडखोर उमेदवारांमुळे भाजपाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीतील महत्त्वाचा घटक म्हणजे महिलांचे वाढलेले मतदान. अंदाजे ५५.३५ टक्के मतदानाची नोंद झाली असून अनेक मतदान केंद्रांवर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
महिला मतदारांचा कौल पूर्णपणे पक्षनिष्ठ न राहता स्थानिक प्रश्न, उमेदवाराची प्रतिमा आणि नागरी सुविधांवर आधारित असल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांचे मतदान निकालावर प्रभाव टाकणार असले, तरी तो नेमका कोणाच्या बाजूने निर्णायक ठरेल, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. वंचित बहुजन आघाडीने ५७ उमेदवार दिल्याने दलित-बहुजन मतदारांमध्ये मतविभाजन होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतांवर होऊ शकतो. काँग्रेसने ४९ उमेदवार दिले असले, तरी अनेक प्रभागांत ती थेट स्पर्धेत असल्याचे चित्र नाही. आम आदमी पक्ष व इतर छोटे पक्ष काही ठिकाणी मतांची गणिते बदलू शकतात; मात्र स्वतंत्र सत्ता स्थापण्याची क्षमता त्यांच्याकडे दिसून येत नाही. एकूणच ८० जागांच्या सभागृहात ४१ जागांचा बहुमताचा आकडा गाठणे कोणत्याही एका पक्षासाठी सोपे नाही. त्यामुळे त्रिशंकू सभागृहाची शक्यता अधिक बळावत आहे. अशा परिस्थितीत निकालानंतर अपक्ष व छोटे पक्ष निर्णायक भूमिका बजावतील. अंतिम सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे केवळ मतमोजणीवर नव्हे, तर त्यानंतर होणाऱ्या राजकीय हालचालींवरही अवलंबून राहणार आहे.
काँग्रेस - ४९
भाजप- ६२
शिवसेना (शिंदे)- ७०
शिवसेना (उबाठा) - ५४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - २३
वंचित - ५७
आम आदमी पक्ष ः ८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १४
अपक्ष - १३२
एकूण - ४६९
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.