CM Shinde - Fadanvis sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : अधिवेशन सुरू होताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहाेचले शेतकऱ्यांच्या बांधावर!

जयेश विनायकराव गावंडे

Nagpur News : अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 7) मौदा तालुक्यातील चाचेर गावाला भेट दिली.

नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाचे पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहाेचले.

नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या वेळी शिंदे आणि फडणवीस यांनी मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांनाही भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून बहिष्कार टाकला. गुरुवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा पुढे करीत सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

विधिमंडळाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी नुकसानग्रस्त भागात दौरा केला. नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जवळपास 124 गावांना फटका बसला आहे. 852 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धानउत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मौदा तालुक्यात रामटेक पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. मंत्री अनिल पाटील, आमदार आशिष जयस्वाल या वेळी उपस्थित होते.

अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर राज्यभरातील नेत्यांनी धाव घेतली होती. काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी 34 जणांची टीमच नेमली होती. जिल्ह्यांमध्ये दौरे केल्यानंतर काँग्रेसच्या सर्व खासदार, माजी मुख्यमंत्री आणि आमदारांनी प्रत्यक्ष पाहणी अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर केला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनीही विदर्भातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली होती.

राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील सर्व मंत्र्यांना संबंधित जिल्ह्यांमध्ये जात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर भाजपचे पालकमंत्री व आमदार खासदारही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.

अशात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे, अशी टीका विरोधकांकडून होत होती. त्यामुळे ऐन अधिवेशन काळात नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत दोन्ही नेत्यांनी विरोधकांना एक शब्दही न बोलता प्रत्युत्तर दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT