Bachchu Kadu  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu On Cabinet Expansion : '' मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांच्या बायकांचाही आता...'; आमदार कडूंचा मिश्किल टोला

सरकारनामा ब्यूरो

Amravati : भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. पण शिंदे फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होऊन देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे शिंदे गटासह भाजपमध्येही नाराजीचा सूर होता. याचदरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी थेट राज्यातील युती सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथही घेतली. सत्तेतील राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे काही जणांच्या मंत्रिपदाच्या स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. यावरुन शिंदे गटातील कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचवेळी आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन मिश्किल टोला लगावला आहे.

आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी बुधवारी( दि.१२) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर मिश्किल टिप्पणी केली आहे. कडू म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारमधील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सातत्यानं आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.

आमदार कडू म्हणाले, मुख्यमंत्री फोन करतात की नाही करत? सर्वजण फोनची वाट पाहत आहेत. बऱ्याच जणांचा यज्ञ सुरू आहे. बायकोही विचारते. काहो फोन येणार आहे का तुम्हाले? मला नाही विचारलं. पण काही आमदारांना त्यांची बायको विचारत असेल. तुमचं काही जमत नाही का? तुम्ही तर लई कष्ट केले ब्वा. लै मेहनत केली. गुवाहाटीला गेले. तिकडे गेले. बदनाम झाले. फोन आला नाही तर कसं कराल? असं आमदारांची बायको त्यांना प्रश्न विचारत आहे असं टोमणा त्यांनी यावेळी मारला.

फोनची वाट पाहण्यात वाईट काय?

मंत्रिमंडळ विस्तारा(Cabinet Expansion)त मंत्रिपदाची संधी मिळेल म्हणून बरेचजण फोनची वाट पाहत आहेत. आम्ही त्या दिवशी बसलो होतो. दोन खासदार होते. तुला फोन आला का? असं ते एकमेकांना विचारत होते. एकजण खोटे बोलला, म्हणाला, मला फोन आला. त्यामुळे चार पाच खासदार दिल्लीला पळाले. त्याला फोन आला आणि आम्हाला का नाही आला? असा प्रश्न त्यांना पडला.

जशी निकालाची आपण वाट पाहतो. तशीच आमदार फोनची वाट पाहत आहेत. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालो पाहिजे. भरत गोगावले(Bharat Gogawale) हे त्यापैकी एक आहे. चांगल्या कॉलची कुणीही वाट पाहतं. फोनची वाट पाहण्यात वाईट काय?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

काँग्रेस (Congress) फोडण्यापेक्षा येणारे स्वत: तयार आहेत. तलवार घेऊन थोडी येतात लोकं. राजकारणात नवीन पॅटर्न आला आहे. पूर्वी धोतर होतं. आता पँट आली. तसं हा पॅटर्न बदलणार आहे. सुरुवात उद्धव ठाकरे यानी केली. विचाराची अनैसर्गिक युती केली. त्याचा शेवट भाजप करत आहे. या पाच वर्षातील ही राजकारणातील मोठी उलाढाल आहे. ती लोकांना पचनी पडत नाहीये, असं चिमटा त्यांनी काढला.

'' अद्याप तरी सुखी माणसाचा सदरा आलेला नाही... ''

अपक्ष आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू नागपूरमध्ये सध्याच्या घडीला राज्यातील खातेवाटप व पालकमंत्रीपदावर भाष्य केलं. कडू म्हणाले, सत्ताधारी पक्षाचे ९० टक्के आमदार मुंबईत आहेत. हाच बच्चू कडू आणि इतर आमदारांमधील फरक आहे. इतके आमदार सांभाळताना नाराजी तर होणारच आहे. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. सगळे आनंदी आहेत असं नाही. विरोधी पक्षातही सगळे आनंदी नाहीत आणि सत्ताधारी पक्षातही सगळे आनंदी नाहीत. त्यामुळे सगळे सुखी राहतील असा सुखी माणसाचा सदरा अद्याप तरी आलेला नाही असंही बच्चू कडूंनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT