Vasantrao Anchilwar, Bala Kashiwar and Pradeep Padole.
Vasantrao Anchilwar, Bala Kashiwar and Pradeep Padole. Sarkarnama
विदर्भ

Bhandara District BJP : जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग, ‘प्रकाशपर्व’ येणार की ‘वसंत’ फुलणार ?

सरकारनामा ब्यूरो

Bhandara BJP District President Change News : भाजपच्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीच्या घोषणेनंतर आता नवीन जिल्हाध्यक्षांचे वेध स्थानिक कार्यकर्त्यांना लागले आहेत. त्यादृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून पात्र उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपणच या पदासाठी योग्य कसे हे श्रेष्ठींपर्यंत पोचवण्याचे इच्छुकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पक्षाची वाढलेली कामे आणि त्याचा कॉर्पोरेट पद्धतीने होत असलेला पाठपुरावा. त्याला द्यावी लागणारी आर्थिक जोड लक्षात घेऊन जे खऱ्या अर्थाने या जिल्हाध्यक्षपदासाठी पात्र आहेत, ते मात्र ही जबाबदारी स्वीकारायला तयार नसल्याचे दिसते. परंतु, कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षपदाला विशेष महत्त्व असल्याने भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत फार मोठी चुरस होणार, हे जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसून येत आहे.

शिस्तबद्ध असलेल्या जिल्हा भाजपमधील दोन गट झाले असून, त्यासाठी थेट पक्ष नेतृत्वाला गळ घातली जात आहे. आगामी काळात नगर परिषद, विधान परिषद, लोकसभा व विधानसभा अशा ओळीने निवडणुका आहेत. पक्षास वेळ देणारा कार्यकर्ता भाजपला शोधावा लागणार असून, श्रेष्ठींकडून कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली जाते, याकडे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा भाजपमधील पक्षांतर्गत नियुक्त्या होऊ घातल्या असून, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चुरस निर्माण झाली आहे. मागच्या वेळी या निवडीनंतर नाराजी नाट्य समोर आल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातील तिन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतदेखील त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला आता सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे ‘अच्छे दिन’चे स्वप्न साकार झाले. मात्र, काही कार्यकर्त्यांना आजही अच्छे दिन आले नसल्याचे कार्यकर्ते व काही पदाधिकारी खासगीत बोलूनही दाखवितात. अंतर्गत कुरबुरीमुळे व गटातटाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांची मानसिकता अशा पद्धतीने झाली असल्याचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भाजपच्या एका जिल्हा नेत्यानेच सांगितले.

शिंदे - फडणवीस सरकार येऊन जवळपास वर्ष झाले. त्यातच विविध शासकीय समित्यांच्या निवड प्रक्रिया रखडल्या आहेत. तरी समित्या गठीत होत नसताना पक्षांतर्गत पदासाठीच्या निवडणूक तोंडावर आल्याने कार्यकर्ते अचानक सक्रिय झाले आहेत. एकूणच पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची आशा कार्यकर्त्यांना असून, पक्षीय संघटनेची जाण असलेल्या नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे जावी, यासाठी नेते मंडळींकडे प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, काही काळापासून पक्षाच्या दूर गेलेले कार्यकर्ते पक्षांतर्गत निवडणुका समोर येताच पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे नव्या दमाचा पदाधिकारी निवडण्याचे आव्हान असणार आहे.

पक्ष संघटन, अनुभव व अभ्यास आवश्यक..

भाजप पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. पंडित दिनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे पक्ष विषयक विचार, ध्येय धोरणावर भाजपची वाटचाल सुरू आहे. मात्र, पक्षात काम करणाऱ्या अनेकांना पक्षाची ध्येय धोरणे माहीत नाहीत. एखाद्या कार्यक्रमात भाषणात संघटनात्मक बोलू शकत नाही. केवळ जिल्हा भाजपमधील मो. तारीफ कुरेशी, प्रकाश मालगावे, ॲड. वसंत एंचीलवार, माजी आमदार बाळा काशीवार वगळता आजमितीस भाजपमध्ये काम करणाऱ्या अनेकांना पंडित दिनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववाद, पथ अंत्योदय याबद्दल जाण नाही. काही आयात नेत्यांना तर संघटना अजूनही कळली नाही.

बाळबुद्धे ‘प्रकाश’पर्व आणतील का ?

प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांचा भंडारा हा गृह जिल्हा आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदेच्या निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात भाजपची सूत्रे अभ्यासू, प्रखर व पक्षाची जाण असलेल्या नेत्याच्या हातात देणे गरजेचे आहे. सध्या जिल्हाध्यक्षपद शिवराम गिऱ्हेपुंजे यांच्याकडे असून, भावी अध्यक्ष म्हणून साकोलीचे प्रकाश बाळबुद्धे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे प्रकाश बाळबुद्धे हे नाव पटोलेंना आव्हान देऊन जिल्ह्यात प्रकाशपर्व आणतील का, यावर देखील मंथन करण्याची गरज आहे.

‘वसंत’ बहाराने कमळ फुलणार ?

कधीकाळी जिल्ह्याच्या लाखांदूर तालुका भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. केंद्र व राज्यात सत्ता नसताना लाखांदूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद सदस्यांपैकी चार ते पाच सदस्य भाजपचे असायचे व पंचायत समितीवर एकहाती सत्ता असायची. जिल्हा भाजपचे श्रद्धास्थान असलेले स्व. नामदेवराव दिवठे हे याच तालुक्यातील असून, ते आमदार व खासदार राहिलेले आहेत. त्यांच्याच विचारसरणीतून वाढलेले ॲड. वसंत एंचीलवार हे भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत.

तत्कालीन आयात आमदाराने ॲड. एंचीलवार यांना पक्षात कमी करण्याच काम केलं होतं. त्यामुळे वसंतरावांनी नाइलाजाने पक्षापासून फारकत घेतली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकारातून पक्षात ते सक्रिय झाले. सध्या लाखांदूर तालुका नाना पटोलेंचा (Nana Patole) बालेकिल्ला समजला जातो. पटोलेंना टक्कर द्यायची असल्यास लाखांदूर तालुक्यात जिल्हाध्यक्ष पद देण्याची गरज आहे. इतिहासात न मिळालेले पक्षीय पद मिळाल्यास निश्चितच ‘वसंत’ बहाराने कमळ फुलणार, असा विश्‍वास कार्यकर्त्यांना आहे.

इच्छुकांची यादी लांबलचक..

भंडारा (Bhandara) जिल्हा भाजप (BJP) अध्यक्षपदासाठी माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार बाळा काशिवार, प्रदीप पडोळे, प्रकाश बाळबुद्धे, राजेश बांते, ॲड. वसंतराव एंचीलवार, प्रशांत खोब्रागडे यांच्यासह अनेक आजी - माजी पदाधिकाऱ्यांची लांबलचक यादी आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT