Ramesh Bais  Sarkarnama
विदर्भ

Bhandara News: राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोरच खासदार, आमदारांनी वाचला तक्रारींचा पाढा

अभिजीत घोरमारे

Vikasit Bharat Yojna : अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीकविमा कंपन्यांतर्फे शेतकऱ्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार भंडारा जिल्ह्यातील स्थानिक खासदार आणि आमदारांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे जाहीरपणे केली.

खासदार आणि आमदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेत त्यांच्याशी चर्चा करू, असे राज्यपाल म्हणाले. यासंदर्भात शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी भंडारा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हा शब्द दिला आणि आपण यासंदर्भात योग्य त्या सूचना देऊ, असे सांगितले.

मंचावर आदिवासी विकासमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजय गावित, भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या अनेक योजना लोकहिताच्या आहेत.

अशा सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं नितांत गरजेचं आहे. योजनांना खरे महत्त्व तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा त्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात, असे मत विकसित भारत योजनेच्या कार्यक्रमात राज्यपाल बैस यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र शासनाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात, या दृष्टिकोनातून भारत सरकारने विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ केलला आहे. भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांत विकसित भारत संकल्प यात्रेचे रथ फिरत असून, केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांची माहिती याद्वारे प्रत्येक लाभार्थ्यांना देण्याचे कार्य केले जात आहे. याच विकसित भारत संकल्प कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस भंडारा जिल्ह्याच्या शहापूर येथील कार्यक्रमात सहभागी झाले.

शासकीय योजनांची माहिती देणारे तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादीत वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लावले होते. स्टॉलला भेट देऊन राज्यपालांनी शेतकऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला विषमुक्त तांदूळ, विविध वस्तू आणि भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोसा यावेळेस राज्यपालांना शेतकऱ्यांमार्फत भेट देण्यात आला. लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते चेक, घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

उपस्थिताना संबोधित करताना राज्यपाल बैस यांनी विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांची संपूर्ण माहिती तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू केली गेलेली एक मोहीम आहे, असे सांगितले. देशातील प्रत्येक जातीधर्माच्या व्यक्तींपर्यंत या योजना पोहोचवाव्यात, हा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनाशी बाळगून त्या दृष्टीने वाटचाल केली आहे.

ही वाटचाल म्हणजे विकसित भारत संकल्प यात्रा आहे. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बऱ्याच योजना या अगाेदरही राबविण्यात येत होत्या. मात्र, या योजनांचे महत्त्व तेव्हाच वाढते जेव्हा त्यांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो. हाच उद्देश ठेवून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी प्रसिद्ध पिंगळाई देवी मंदिर कोरंबी येथे जात देवीचे दर्शन घेतले.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT