Nagpur News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेवरून मंगेशकर कुटुंबीयांना लुटारूंची टोळी असे संबोधणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांवर टीका होत आहे. विदर्भातील इंदिरासागर (गोसेखुर्द) धरणाच्या घोटाळ्यात इंदिरा गांधी व त्यांच्या कुटुंबीयांचा हात आहे का, अशी विचारणा भाजपचे आमदार संदीप जोशी आणि नागपूरच्या कलावंतांनी केली आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जोशी यांनी वडेट्टीवारांच्या कुटुंबीयांनी समाजसेवेसाठी आजवर किती रुपये दान केले हे जाहीर करावे, असेही आवाहन केले आहे. विजय वडेट्टीवार यांच्याशी आपले वाईट संबंध नाहीत किंवा मंगेशकर कुटुंबीयांशी आमचे हितसंबंध नाहीत. मात्र वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाने देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात चीड निर्माण केली आहे, असे जोशी म्हणाले.
कलाप्रेमी, कला उपासक दुखावले गेले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी, असे आवाहन जोशी यांनी केले आहे. विदर्भातील सर्वाधिक मोठे गोसेखुर्द धरणाचे भूमिपूजन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले होते. या धरणाला इंदिरा सागर असे नाव देण्यात आले आहे. या धरणाच्या बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. हे सर्व घोटाळे इंदिरा गांधी व त्यांच्या कुटुंबीयांनी केले, असे आम्ही म्हणायचे का, असा सवालही जोशींनी केला.
लता मंगेशकर यांनी कुठली समाजसेवा केली, किती दान केले, असे वक्तव्य वडेट्टीवारांनी केले आहे. यावर जोशी यांनी लता मंगेशकर या 'भारतरत्न' आहेत, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा देशातील व राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने त्या सन्मानित असल्याचे सांगितले. मंगेशकर कुटुंबीयातील आशाताई भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर हे सदस्यही सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित आहेत. वडेट्टीवार यांच्या परिवारात कोणाला तरी या दर्जाचा एखादा पुरस्कार मिळाला असेल तर तो त्यांनी जाहीर करावा, असा टोलाही जोशी यांनी लगावला.
पुलवामा येथे लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी स्वतः लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एक कोटी रुपये सैन्याला दान केले होते. असे असतानाही मंगेशकर कुटुंबीय ही लुटारुंची टोळी आहे, त्यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का, असे वडेट्टीवार म्हणत असतील तर वडेट्टीवारांच्या परिवाराने या लुटारुंच्या टोळीपेक्षा केलेले दान जास्त असेल तर जनतेसमोर आणावे. आम्ही जाहीर माफी मागू, असे थेट आव्हानच संदीप जोशी यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.