Nana Patole-Somdatta Karanjekar  Sarkarnama
विदर्भ

Somdatta Karanjekar : भाजप नाना पटोलेंना ‘होम ग्राउंडव’रच देणार धक्का; संघाच्या मुशीत घडलेला नेता विधानसभेला देणार टक्कर

Vijaykumar Dudhale

Nagpur, 22 August : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात साकोली मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. संघाचे माजी विदेश प्रचारक डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी साकोलीतून निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती आहे, त्यामुळे साकोलीत पटोलेंच्या विरोधात भाजप आणि संघाची ताकद एकवटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

साकोली मतदारसंघातून नाना पटोले (Nana Patole) यांनी दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. मागील 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवून निवडून आले आहेत, तर 2009 ची विधानसभा निवडणूक पटोले यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली होती.

मात्र, 2014 मध्ये त्यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवून जिंकले होते. मात्र, मोदींशी न पटल्यामुळे ते भाजपमधून बाहेर पडले होते. भाजपमधून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोपवलेले आहे.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी कायमच भाजपला शिंगावर घेतले आहे. अनेकदा थेट ते मोदींवर हल्ला करतात, त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपने विदर्भासह महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ला आहे. आता भाजपने विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून त्यासाठी उमेदवारीची निवडही त्याच पद्धतीने करण्यात येत आहे. तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.

निवडणूक लढविण्यासंदर्भात सोमदत्त करंजेकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाने संधी दिली तर मी साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेन. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही या भागात काम करत आहोत. जॉब फेअरसारखे उपक्रम आम्ही आयोजित करीत आहोत. मतदारसंघात व्हिजनची कमतरता जाणवत होती. आमच्याकडे व्हीजन आहे, लोकसंपर्क आहे. चांगली यंत्रणा आमच्यासोबत आहे. मतदारसंघातील जनतेचीही आम्हाला भाजपने उमेदवारी द्यावी, या मताचे आहेत.

नाना पटोले दिग्गज नेते आहेत, त्यांचं मोठ नाव आहे. पण १९९० पासून ते सक्रीय राजकारणात आहे. मात्र साकोलीचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. समाज भवन बांधणे असा येथील विकासाचा पॅरामीटर मानला जात आहे. पण उर्वरीत महाराष्ट्रात वेगवेगळे प्रकल्प राबविले जात आहे. मतदारसंघाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. भेलसारखा प्रकल्प, सिंचन प्रकल्पही पूर्ण केलेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

आमचे नाना पटोले यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मात्र, राजकीय नेता म्हणून नाना पटोले हे या मतदारसंघाचा विकास करू शकलेले नाहीत. इतर राजकीय नेत्यांचे मतदारसंघात जो विकास दिसतो, तसा विकास साकोलीत दिसत नाही, असा टोलाही करंजेकर यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT